आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने कंबर कसली आहे. ठाकरे गट कोणताही धोक पत्करण्याच्या तयारीत नाही. त्या दृष्टीने रणनिती आखली जात आहे. मुंबई महापालिका काही झाली तरी जिंकायची असा चंग उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मुंबई हा शिवसेनेचा जीव आहे. राज्यात जरी पराभव झाला असताल तरी मुंबईत आपलीच ताकद आहे हे ठाकरेंना दाखवून द्यायचे आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी डिनर डिप्लोमसीचा आधार घेतला होता. यात मोठा निर्णय झाल्याचे समजते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिवसेना उद्धव ठाकरे गटाची डिनर डिप्लोमसी शुक्रवारी पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदार आणि खासदारांना खास कानमंत्र दिला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही डिनर डिप्लोमसी आयोजित करण्यात आली होती. यावेळी ठाकरेंनी संवाद साधला. आगामी पावसाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना राज्यातील मुद्दे घेऊन कसे कोंडीत पकडायचे यावर मंथन झाले. संख्येने कमी असलो तरी सभागृहात आक्रमक रहा असं ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
या बैठकीत मनसे बरोबर युतीची ही चर्चा झाली. मनसे सोबत युती संदर्भात स्थानिक स्तरावर काय वातावरण आहे याची चाचपणी करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या. शिवाय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे आता लक्ष केंद्रित करा. त्या अनुषंगाने बांधणी करुन कामाला लागा असं ही त्यांनी सांगितलं आहे. निवडणुकीत युती होईल किंवा होणार नाही याचा जास्त विचार करू नका. मात्र एकट्याने लढण्याची तयारी ठेवा असा संदेश ही ठाकरे यांनी या निमित्ताने दिली आहे.