Urban Naxal involvement in Ashadhi Wari : आषाढी वारी ही महाराष्ट्राची मोठी सांस्कृतिक परंपरा आहे. वर्षानुवर्ष हजारो वारकरी आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्या ओढीनं आळंदी ते पंढरपूर पायी वारी करतात. यंदा आषाढी एकादाशी ही रविवारी (5 जुलै) रोजी आहे. त्यानिमित्तानं सुरु झालेली आषाढी वारी आता अंतिम टप्प्यात आहे. पण, त्याचवेळी या वारीमध्ये 'अर्बन नक्षल' शिरल्याचा आरोप शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी विधानपरिषदेमध्ये केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे आरोप?
'आषाढी वारीमध्ये देवाला न मानणाऱ्या नास्तिक लोकांचा शिरकाव झालेला आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. हे अर्बन नक्षल संविधान दिंडी, पर्यावरण वारी, लोकायत यासारख्या वेगवेगळ्या नावाखाली हे वारीमध्ये जाऊन पथनाट्य करतात, भाषणं करतात आणि लोकांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करतात.
राज्य सरकार येत्या अधिवेशनात महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक आणणार आहे. हे विधेयक अशा व्यक्तींना अटकाव करण्यासाठी आहे. हा गंभीर प्रकार आहे. यापूर्वी काही जणांनी वारीवर मटणाचे तुकडे फेकण्याचा प्रकार घडला होता.
(नक्की वाचा: 'भारत जोडो' अभियानात शहरी नक्षलवाद्यांचा शिरकाव, RR पाटलांचा संदर्भ देत CM फडणवीसांचा खुलासा )
बंडातात्या कराडकर यांनीही या प्रकारावर सविस्तर भाष्य केले आहे. या सर्व प्रकारावर त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनही दिलं आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. दोन दिवसांमध्ये आषाढी एकादशी येत आहे. या प्रकरणावर सरकारनं तातडीनं गंभीर कारवाई करावी,' अशी मागणी कायंदे यांनी केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची दखल घेत योग्य कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.