मनोज सातवी, प्रतिनिधी
Vasai-Virar Mayor 2026 Update : वसई-विरार महानगरपालिकेचा पुढचा महापौर कोण असणार? याबाबत राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. अशातच बहुजन विकास आघाडीचे प्रमुख आमदार हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.महापालिकेत बहुजन विकास आघाडीमधून एकापेक्षा एक अनुभवी आणि दिग्गज नेते निवडून आले आहेत. महापौरपदासाठी सक्षम चेहऱ्यांची कोणतीही कमतरता नसल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले. सर्व इच्छुक आणि पात्र नेत्यांशी चर्चा करूनच वसई-विरारचा महापौर निश्चित केला जाईल,असं म्हणत ठाकूर यांनी महापौरपदाच्या नावाबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे. महापौरपदासाठी भाजपने ऐनवेळी तिकीट नाकारलेले आणि तब्बल 40 ते 45 वर्षांचा राजकीय अनुभव असलेले, सरपंच पदापासून नगरसेवक आणि विविध महत्त्वाची पदे भूषवलेले शेखर धुरी यांचेही नावही चर्चेत आहे.
दरम्यान,मुंबई महापौरपदाच्या आरक्षण सोडतीबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आरक्षण सोडतीचा संपूर्ण कारभार चुकीचा असून विद्यमान नियम विशिष्ट समाजावर अन्याय करणारे असल्याचा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला. यावेळी ST महिला आरक्षण पडेल,अशी अपेक्षा होती, मात्र तसे न झाल्याचे त्यांनी नमूद केले. जनरल जागेवर ST प्रवर्गातून उमेदवारी देण्यात आल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित करत आरक्षण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
नक्की वाचा >> Nagpur Mayor 2026 : नागपूरमध्ये कोण होणार महापौर? का होतेय शिवानी दाणी यांची चर्चा? वाचा Inside Story
बहुजन विकास आघाडीतील अनेक नावांची जोरदार चर्चा
दरम्यान, वसई-विरार महानगरपालिकेच्या संभाव्य महापौरपदासाठी बहुजन विकास आघाडीतील अनेक नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये पक्षाचे संघटक सचिव व माजी स्थायी समिती सभापती आजीव पाटील,माजी महापौर प्रवीण शेट्टी,तिसऱ्यांदा निवडून आलेले कन्हैयाबेटा भोईर,रंजना लाडक्या थालेकर,तसेच लॉरेस डायस, हबीब शेख,प्रकाश रॉड्रिंक्स,माजी स्थायी समिती सभापती प्रफुल्ल साने यांचा समावेश आहे.
कोणाच्या नावावर होणार शिक्कामोर्तब?
याशिवाय भाजपने ऐनवेळी तिकीट नाकारलेले तब्बल 40 ते 45 वर्षांचा राजकीय अनुभव असलेले, सरपंच पदापासून नगरसेवक आणि विविध महत्त्वाची पदे भूषवलेले शेखर धुरी यांचे नावही चर्चेत आहे.अनेक अनुभवी आणि वजनदार नेत्यांची नावे समोर असल्यामुळे बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर अखेर कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, याकडे संपूर्ण वसई-विरारचे लक्ष लागून राहिले आहे. महापौरपदाचा निर्णय हा केवळ पदापुरता मर्यादित न राहता आगामी काळातील पालिकेच्या राजकारणाची दिशा ठरवणारा असेल.