आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सच्या अडचणी संपण्याचे नाव घेत नाहीत. आधीच गुणतालिकेत नवव्या स्थानावर असलेल्या मुंबईला आता मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. संघाचा नियमित कर्णधार हार्दिक पांड्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) विरुद्धच्या सामन्यासाठी संघासोबत रायपूरला रवाना झाला नसल्याचे समोर आले आहे.
विमानतळावर हार्दिकची अनुपस्थिती
'क्रिकबझ'ने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 1 वर मुंबई इंडियन्सचा ताफा दाखल झाला तेव्हा त्यात हार्दिक पांड्या कोठेही दिसला नाही. पाठीच्या दुखण्यामुळे त्याने लखनौ सुपर जायंट्स (LSG) विरुद्धचा मागील सामना खेळला नव्हता. मात्र, तो रायपूरमध्ये संघाला जॉईन होईल अशी अपेक्षा होती. आता तो थेट रायपूरला पोहोचणार की दुखापतीमुळे पुढील काही सामने खेळू शकणार नाही, याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.
(नक्की वाचा- Tamil Nadu Election: थलपती विजयच्या TVK ला काँग्रेसचा पाठिंबा; मात्र ठेवली मोठी अट)
कामगिरी आणि नेतृत्वावर प्रश्नचिन्ह
हार्दिकसाठी हा हंगाम वैयक्तिकरित्या अतिशय खराब राहिला आहे. त्याने फलंदाजी करताना 8 सामन्यात केवळ 146 धावा केल्या. तर गोलंदाजीतही तो प्रभाव पाडण्यास अपयशी ठरला आहे. रोहित शर्माकडून संघाचं नेतृत्व काढून हार्दिकला दिल्याने चाहत्यांमध्ये आधीच नाराजी होती. त्यातच 10 पैकी केवळ 3 विजयांसह मुंबईचा संघ पॉईंट टेबलमध्ये तळाला आहे.
काय म्हणाले संघसहकारी?
हार्दिकच्या दुखापतीबाबत विचारले असता, सहकारी रायन रिकलटन म्हणाला, "मला त्याच्या दुखापतीबाबत फारशी कल्पना नाही. मला फक्त इतकेच माहिती आहे की त्याला पाठीचा त्रास आहे. तो रायपूरमध्ये संघासोबत असेल अशी आशा आहे." हार्दिकच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवने मागील सामन्यात नेतृत्व केले होते.
(नक्की वाचा- Nagraj Manjule: नागराज मंजुळेसह जिओ सिनेमाला पुणे न्यायालयाचा दणका! 'खाशाबा'चा वाद थेट कोर्टात)
टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर सूर्यकुमार, बुमराह आणि हार्दिक यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली असलेली 'स्थिरता' हार्दिकच्या काळात हरवल्याचे चित्र दिसत आहे. मुंबई इंडियन्स आता आरसीबीविरुद्ध हार्दिकविना मैदानात उतरणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.