
India tour of Australia: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकूनही टीम इंडियाचा वन-डे कॅप्टन रोहित शर्माला (Rohit Sharma) पदावरून हटवण्याचा धक्कादायक निर्णय निवड समितीने घेतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे मालिकेसाठी शुबमन गिल (Shubman Gill) याला वन-डे टीमचा नवा कॅप्टन बनवण्यात आले आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी हा निर्णय घेण्यामागची तीन महत्त्वाची कारणे स्पष्ट केली.
निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरनं हेड कोच गौतम गंभीर आणि बीसीसीआय सचिव देवाजीत सैकिया यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला. रोहितला या निर्णयाची माहिती देण्यात आली होती, असेही आगरकरनं पत्रकार परिषेदत स्पष्ट केले. मात्र रोहित शर्मा 2027 चा वन-डे वर्ल्ड कप खेळणार का? या प्रश्नाचं उत्तर देणं त्यानं टाळलं.
एक नाही अनेक कारणं....
अजित आगरकरनं या पत्रकार परिषदेमध्ये रोहितला हटवून शुबमन गिल वन-डे टीमचा कॅप्टन का झाला? याची माहिती दिली. त्यानं सांगितलं की, तिन्ही फॉरमॅटमध्ये तीन वेगवेगळे कॅप्टन असणे ही गोष्ट फारच अव्यावहारिक आहे. म्हणूनच आम्ही शुभमन गिलला वनडे कॅप्टन बनवण्याचा निर्णय घेतला. रोहित आणि विराट सध्या एकच फॉरमॅट (वनडे) खेळत आहेत. त्यांच्या 2027 मधील वर्ल्ड कप खेळण्याबाबत आज चर्चा करण्याची आवश्यकता मला वाटत नाही. पण टीमचा कॅप्टन बदलण्यावर आमचे मत ठाम होते.
( नक्की वाचा : Asia Cup Trophy Row: विराट कोहलीचा 'खास दोस्त' पाकिस्तानच्या बाजूने! टीम इंडियाला सुनावले, 'खेळात राजकारण नको' )
आगरकरनं पुढे सांगितलं की, हा निर्णय घेताना अनेक गोष्टी विचारात घेण्यात आल्या. पहिली गोष्ट म्हणजे, खेळाच्या तिन्ही फॉरमॅटसाठी तीन वेगवेगळे कॅप्टन असणे, हे नियोजनाच्या दृष्टीने अव्यावहारिक आहे. दुसरे कारण म्हणजे, कुठल्यातरी टप्प्यावर तुम्हाला पुढील वर्ल्ड कप कधी आहे, याचा विचार सुरू करावाच लागतो. याशिवाय, वनडे हा आता सर्वात कमी खेळला जाणारा फॉरमॅट आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही पुढील फळीतील खेळाडूंना जास्त सामने देऊ शकत नाही. किंवा, एखादा नवा खेळाडू कॅप्टन होणार असेल किंवा टीममध्ये स्थान मिळवणार असेल, तर त्याला स्वतःची तयारी करण्यासाठी किंवा रणनीती आखण्यासाठी पुरेसे सामने मिळत नाहीत.'
कॅप्टनीवरुन हटवल्यानंतर रोहितने कशी प्रतिक्रिया दिली, हे आगरकर यांनी सांगितले नाही, पण त्यांना हटवण्याचा निर्णय घेणे खूप कठीण होते, हे त्याने स्पष्ट केले.
भारताची 15 सदस्यीय वनडे टीम : शुबमन गिल (कॅप्टन), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर ( व्हाईस कॅप्टन ),अक्षर पटेल,केएल राहुल (विकेटकीपर),नीतीश कुमार रेड्डी,वॉशिंगटन सुंदर,कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज,अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा,ध्रुव जुरेल (विकेटकीपर) आणि यशस्वी जैस्वाल.
भारताची 16 सदस्यीय टी-20 टीम : सूर्यकुमार यादव (कॅप्टन),अभिषेक शर्मा,शुबमन गिल (व्हाईस कॅप्टन),तिलक वर्मा, नीतीश कुमार रेड्डी,शिवम दुबे,अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर),वरुण चक्रवर्ती,जसप्रीत बुमराह,अर्शदीप सिंग, कुलदीप यादव,हर्षित राणा,संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंह,वॉशिंग्टन सुंदर.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world