Who is Raghu Sharma,MI vs LSG IPL 2026: आयपीएल 2026 च्या मैदानात रोज नवे खेळाडू चमकतात. सोमवारची संध्याकाळ ही देखील त्याला अपवाद नव्हती. मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातल्या सामन्यात एका खेळाडूने विकेट घेतली आणि खिशातून एक चिठ्ठी काढली. त्या चिठ्ठीवर लिहिले होते, 15 वर्षांची वेदनादायी प्रतीक्षा आज संपली. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून रघू शर्मा आहे. ज्याच्या एका विकेटने केवळ लखनऊचा बॅटर बाद झाला नाही, तर एका खेळाडूच्या प्रदीर्घ संघर्षावर विजयाची मोहोर उमटली.
15 वर्षांचा वनवास आणि गुरुदेवाची कृपा
रघू शर्मा याने लखनऊच्या अक्षत रघुवंशीला बाद करून आयपीएलमधील आपली पहिली विकेट मिळवली. विकेट घेताच त्याने खिशातून एक चिठ्ठी काढली आणि स्टँड्सकडे दाखवली. त्यावर लिहिले होते, राधे राधे. गुरुदेवाच्या कृपेनं 15 वर्षांची अतिशय वेदनादायी प्रतीक्षा संपली. मुंबई इंडियन्सचे धन्यवाद. जय श्रीराम.
रघू शर्मा याच्यासाठी हा केवळ एक सामना नव्हता, तर गेल्या 15 वर्षांपासून त्याने पाहिलेल्या स्वप्नांची पूर्तता होती. जय श्री रामचा जयघोष करत त्याने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
Raghu's first wicket, and what it meant 🥹🫶#MIvLSG pic.twitter.com/bcmRMVRSJr
— Mumbai Indians (@mipaltan) May 4, 2026
यूट्यूबवरून शिकला शेन वॉर्नची कला
रघू शर्मा याची गोष्ट एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी आहे. पंजाबच्या जालंधरचा असलेल्या रघू याने वयाच्या 18 व्या वर्षी क्रिकेट गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी त्याचे वजन 102 किलो होते. व्यावसायिक क्रिकेट खेळण्यासाठी त्याने स्वतःला झोकून दिले आणि तब्बल 35 किलो वजन कमी केले. विशेष म्हणजे, लेग-स्पिनच्या बारकाव्यांसाठी त्याने कोणताही महागडा कोच लावला नव्हता. महान फिरकीपटू शेन वॉर्न यांचे यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहून तो फिरकीची कला शिकला.
( नक्की वाचा : Vinod Kambli: विनोद कांबळीच्या संघर्षाचा आईस्क्रीम कंपनीकडून सौदा? सोशल मीडियावर तीव्र संताप, काय आहे प्रकरण? )
25 व्या वर्षी म्हातारा म्हणून टीममधून बाहेर
रघू शर्मा याने 2017 मध्ये पंजाबसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र, अवघ्या 25 व्या वर्षी त्याला म्हातारा किंवा वय झालेला खेळाडू म्हणत संघातून टीमच्या रस्ता दाखवण्यात आला. अनेकांसाठी ही कारकिर्दीची अखेर होती, पण रघू शर्मा हरला नाही. त्याने पंजाब सोडून पुडुचेरी गाठले आणि त्यानंतर उत्तराखंडसाठी मैदानात उतरला. स्थानिक क्रिकेटमधील त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल अखेर मुंबई इंडियन्सने घेतली आणि त्याला जगातील सर्वात मोठ्या लीगमध्ये खेळण्याची संधी दिली.
( नक्की वाचा : Virat Kohli विराटने मोडले सर्व रेकॉर्ड्स! 13 बॉलच्या वादळात असा पराक्रम केला की क्रिकेट जगताचे डोळे विस्फारले )
मुंबईचा विजय आणि रघू शर्माचा दबदबा
लखनऊने या सामन्यात निकोलस पूरनच्या 63 रन्सच्या जोरावर 228 रन्सचा डोंगरासारखा स्कोर उभा केला होता. मात्र, मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी हे आव्हान सोपे केले. रोहित शर्माच्या 84 आणि रेयान रिकेल्टनच्या 83 रन्सच्या जोरावर मुंबईने हा सामना 6 विकेट्सने खिशात घातला. या धावांच्या पावसातही रघू शर्मा याने आपल्या 4 ओव्हर्समध्ये शिस्तबद्ध गोलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मुंबईसाठी हा विजय महत्त्वाचा होताच, पण त्याहून अधिक महत्त्वाचा ठरला तो रघू शर्मा नावाच्या जिद्दी खेळाडूचा उदय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world