भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच टेस्ट मॅचची सीरिज 20 जूनपासून सुरु होत आहे. या सीरिजपूर्वी रोहित शर्मानं (Rohit Sharma) टेस्ट क्रिकेटमधून क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यामुळे रोहितनंतर टीम इंडियाचा कॅप्टन कोण होणार? हा सर्वात मोठा प्रश्न होता. फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहचं नाव (Jasprit Bumrah) यामध्ये सर्वात आघाडीवर होतं. कारण, त्यानं यापूर्वी टीम इंडियाचं नेतृत्त्व केलं होतं. तसंच तो रोहितच्या कालावधीत टीमचा व्हाईस कॅप्टन देखील होता. पण, निवड समितीनं इंग्लंड सीरिजसाठी शुबमन गिललं (Shubman Gill) कॅप्टन करत अनेकांना धक्का दिला. आता पहिली टेस्ट सुरु होण्याच्या काही दिवस उरले असताना बुमराहनं या प्रकरणात मौन सोडलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाला बुमराह?
टीम इंडियाची कॅप्टनसी स्वीकारण्यास मीच नकार दिला होता, असा खुलासा बुमराहनं केला आहे. स्काय स्पोर्ट्सवर दिनेश कार्तिकशी बोलताना बुमराहनं हा खुलासा केला. बुमराह म्हणाला, 'कोणत्याही काल्पनिक कथा नाहीत, कोणताही वाद नाही किंवा मला काढून टाकण्यात आले किंवा माझ्याकडे पाहिले नाही असे कोणतेही ब्रेकिंग स्टेटमेंट नाही. आयपीएल दरम्यान, रोहित आणि विराटच्या निवृत्तीपूर्वी, मी बीसीसीआयशी बोललो होतो. मी पाच टेस्ट मॅचच्या सीरिज दरम्यान माझ्या वर्कलोडबद्दल चर्चा केली होती.
ज्या लोकांनी माझ्या पाठीच्या दुखापतींवर उपचार केले होते, त्यांच्याशी मी बोललो. मी सर्जनशीही बोललो. कामाचा ताण होता, त्यामुळे मी त्यांच्याशी बोललो आणि त्यानंतर आम्ही या निष्कर्षावर पोहोचलो की, मला थोडे अधिक स्मार्ट व्हायला हवे, म्हणून मी बीसीसीआयला फोन केला आणि माझा कॅप्टन म्हणून विचार करु नका, असं सांगितलं.'
( नक्की वाचा : Sarfaraz Khan: 'सरफराजबाबत काहीतरी चुकीचं घडलंय,' टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा धक्कादायक दावा )
BCCI चा विचार काय होता?
यावेळी जसप्रीत बुमराह म्हणाला की, रोहितच्या निवृत्तीनंतर मला कॅप्टन बनवण्याचा विचार होता. 'बीसीसीआय माझ्याकडे कॅप्टन म्हणून पाहत होती, पण त्यावेळी मला सांगावे लागले की, हे टीमसाठी योग्य नाही. तुम्हाला माहीत आहे की, पाच टेस्टच्या सीरिजसाठी तीन मॅचसाठी एक कॅप्टन आणि दोन मॅचसाठी दुसरा कॅप्टन, हे टीमसाठी योग्य नाही आणि मला नेहमी टीमला प्राधान्य द्यायचे होते.'
जसप्रीत बुमराह पुढे म्हणाला, "कर्णधारपद हे एक पद आहे, पण तुमच्या संघात नेहमीच लीडर्स असतात. मला असे करायचे होते आणि अर्थातच, जर मी सावध राहिलो नाही, तर मला भविष्याबद्दल माहीत नाही. मला अशा स्थितीत राहायचे नाही, जिथे अचानक तुम्हाला कळेल की मला या फॉरमॅटमधून बाहेर पडावे लागेल. त्यामुळे मला वाटले की सातत्यासाठी आणि हे टीमसाठी योग्य आहे.'