भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आणि नुकतीच टी-20 संघाची कमान हाती घेतलेला कर्णधार श्रेयस अय्यर सध्या मैदानाबाहेरही चांगलाच चर्चेत आहे. मुंबईतील रिअल इस्टेट बाजारातील एका सर्वात मोठ्या कराराची नोंद करत, श्रेयसने मुंबईतील वरळी भागात एक अतिशय आलिशान आणि महागडे अपार्टमेंट भाड्याने घेतले आहे. 'स्क्वेअर यार्ड्स' या रिअल इस्टेट सल्लागार कंपनीने नोंदणी महानिरीक्षक (IGR) कार्यालयाच्या संकेतस्थळावरून या कराराची अधिकृत माहिती समोर आणली आहे.
घर नव्हे, राजवाडा! कसा आहे हा फ्लॅट?
वरळीतील अति-प्रीमियम आणि लक्झरी समजल्या जाणाऱ्या 'आर्टेशिया' या टोलेजंग इमारतीमध्ये श्रेयसने हे घर घेतले आहे.
- क्षेत्रफळ: हे अपार्टमेंट तब्बल 360 चौरस मीटर म्हणजेच सुमारे 3875 स्क्वेअर फूट क्षेत्रफळात पसरलेले आहे.
- गाड्यांसाठी भव्य जागा: श्रेयसच्या गाड्यांच्या ताफ्यासाठी या करारांतर्गत तब्बल 4 हक्काच्या पार्किंग स्पेस देण्यात आल्या आहेत.
- सुरक्षा ठेव: या करारासाठी श्रेयसने तब्बल 74 लाख रुपये इतकी मोठी सुरक्षा ठेव जमा केली आहे.
- सरकारी शुल्क: या व्यवस्थेसाठी 1.84 लाख रुपये मुद्रांक शुल्क आणि 1000 रुपये नोंदणी शुल्क भरण्यात आले आहे.
(नक्की वाचा- Dharashiv News: "शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोफत देतो, पण...", शेतकऱ्याच्या एका अटीचा तुम्हालाही अभिमान वाटेल)
दरवर्षी वाढणार भाडे, 3 वर्षांचा करार
श्रेयस अय्यरने हा भाडेपट्टा 36 महिन्यांसाठी साइन केला आहे. या करारात दरवर्षी अंदाजे 7% भाडेवाढीची अट ठेवण्यात आली आहे.
- पहिले वर्ष: दरमहा 18.50 लाख रुपये भाडे.
- दुसरे वर्ष: भाडे वाढून 19.79 लाख रुपये प्रतिमहिना होईल.
- तिसरे वर्ष: भाडे थेट 21.18 लाख रुपये प्रतिमहिना होणार आहे.
या तिन्ही वर्षांचा हिशोब जोडल्यास, श्रेयस या घरासाठी एकूण 7.14 कोटी रुपये इतके प्रचंड भाडे मोजणार आहे.
(नक्की वाचा- प्रशांत महासागरात 'एल निनो' सक्रिय; डिसेंबरमध्ये गाठणार अतितीव्र पातळी, भारतीय मान्सूनवर होणार गंभीर परिणाम)
श्रेयस अय्यरचा ऐतिहासिक कमबॅक
दरम्यान, भारतीय क्रिकेट वर्तुळात गेल्या काही महिन्यांत सर्वाधिक स्थित्यंतरे श्रेयस अय्यरच्या कारकिर्दीत पाहायला मिळाली आहेत. 3 डिसेंबर 2023 ते 6 जून 2026 या कालावधीत श्रेयसने अनेक चढ-उतार अनुभवले. नुकतीच भारतीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सूर्यकुमार यादवऐवजी श्रेयस अय्यरकडे भारताच्या टी-20 संघाचे नेतृत्व सोपवले आहे.
देशांतर्गत रणजी सामने न खेळल्यामुळे फेब्रुवारी 2024 मध्ये बीसीसीआयने (BCCI) श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना केंद्रीय करारातून बाहेर काढले होते. केंद्रीय करार परत मिळवण्यासाठी श्रेयसला वर्षभर वाट पाहावी लागली. या काळात 2024 व 2026 चे टी-20 विश्वचषक आणि 2025 च्या आशिया चषक संघातूनही त्याला डच्चू देण्यात आला होता.
या काळात त्याने केवळ आपल्या बॅटिंग आणि फिटनेसवर लक्ष केंद्रित केले. अखेर त्याच्या याच खडतर आणि जिद्दी प्रवासाची दखल घेऊन निवड समितीने त्याला थेट भारतीय टी-20 संघाचा मुख्य मार्गदर्शक आणि कर्णधार बनवले आहे.