T20 World Cup 2026: टी-20 विश्वचषक 2026 ची सुपर 8 फेरी रोमांचक वळणावर आली आहे. सुपर-8 फेरीतील सामन्यांनी समीकरणे पूर्णपणे बदलून टाकली आहेत. रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळालेल्या 76 धावांच्या पराभवानंतर टीम इंडिया आधीच अडचणीत होती. त्यातच सोमवारी वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेवर 107 धावांनी मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासाठी सेमीफायनलची दारे कठीण करून ठेवली आहेत.
वेस्ट इंडिजने कसं बिघडवलं भारताचं समीकरण?
वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेला धूळ चारत आपला नेट रन-रेट थेट +5.350 वर नेला आहे. सध्याच्या परिस्थितीत ग्रुप-बी मधून वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका प्रत्येकी 2 गुणांसह शर्यतीत पुढे आहेत. भारताचा रन रेट (-3.800) ही सर्वात मोठी चिंतेची बाब ठरत आहे. जर भारताने झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजला हरवले आणि दक्षिण आफ्रिकेनेही वेस्ट इंडिजला हरवले, तर तिन्ही संघांचे 4 गुण होतील. अशा वेळी फैसला नेट रन-रेटवर होईल, जिथे भारत सध्या खूप मागे आहे.
(नक्की वाचा- T20 World Cup 2026: 'विंडिज'च्या विजयामुळे पाँईंटटेबलमध्ये उलटफेर! भारत टेंशनमध्ये; सेमीफायनलची समीकरणे बदलली)
सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारतासमोरचे पर्याय
दोन्ही सामने जिंकणे अनिवार्य: भारताला त्यांचे उरलेले दोन्ही सामने (झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज विरुद्ध) जिंकावेच लागतील. यामुळे भारताचे 4 गुण होतील.
मोठ्या फरकाने विजय: केवळ विजय पुरेसा नाही. भारताला आपला रन-रेट उणे मधून अधिक (+) मध्ये आणण्यासाठी प्रचंड मोठ्या फरकाने सामने जिंकावे लागतील.
इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून: जर भारत एक सामना हरला, तर त्यांचे आव्हान जवळपास संपुष्टात येईल. त्यामुळे दोन्ही विजय आणि चांगला रन-रेट हाच एकमेव मार्ग आहे.
नेट रन-रेटचे कठीण गणित
जर भारताला आपला नेट रन-रेट 0.00 वर आणायचा असेल तर, जर झिम्बाब्वेने कितीही धावा केल्या (उदा. 120 किंवा 150) तर भारताला ते लक्ष्य केवळ 8.2 ओव्हर्समध्ये पूर्ण करावे लागेल. तर दक्षिण आफ्रिकेच्या नेट रन रेटला (+3.800) मागे टाकण्यासाठी त्यांना हे लक्ष्य 5.2 षटकांत गाठावे लागेल. हे स्वप्नातही शक्य होणार नाही.
(नक्की वाचा- T20 World Cup 2026 Semifinal Scenarios: टीम इंडिया सेमीफायनल गाठणार की नाही? ही आहेत 2 समीकरणे)
झिम्बाब्वेविरुद्ध कशी लागेल कामगिरी?
याशिवाय जर भारत प्रथम फलंदाजी करत असेल, तर त्यांना झिम्बाब्वेला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल. भारताने 160 धावा केल्या तर त्यांना झिम्बाब्वेला 84 किंवा त्यापेक्षा कमी धावांवर रोखावं लागेल. जर टीम इंडियाने 180 धावा केल्या तर त्यांना 104 किंवा त्यापेक्षा कमी धावांवर रोखावं लागेल. जर भारताने 200 धावा केल्या तर झिम्बाब्वेला 124 किंवा त्यापेक्षा कमी धावांवर रोखावं लागेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world