T20 World Cup 2026: टी-20 विश्वचषकाच्या सुपर 8 फेरीतील पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा दारूण पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 188 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजी पूर्णपणे कोलमडली आणि संपूर्ण संघ केवळ 111 धावांत गारद झाला. या पराभवामुळे भारताचा नेट रन रेट मोठ्या प्रमाणात घसरला असून उपांत्य फेरीचा रस्ता खडतर झाला आहे.
सामन्याचा थोडक्यात आढावा
प्रथम फलंदाजी करताना डेव्हिड मिलरच्या 63 आणि डेवाल्ड ब्रेविसच्या धडाकेबाज 45 धावांच्या जोरावर 187 धावसंख्या उभारली. जसप्रीत बुमराहने 15 धावांत 3 विकेट घेत उत्कृष्ट कामगिरी केली, पण इतर गोलंदाजांनी तेवढी उत्तम कामगिरी केली नाही. त्यानंतर मार्को जॅनसेनच्या 4 विकेट्सच्या जोरावर भारताचा डाव 111 धावांत आटोपला. भारताला 76 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
(नक्की वाचा- T20 World Cup 2026, IND v SA: भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात दोन सख्खे भाऊ आमनेसामने, "आमच्या आईला टेन्शन..")
उपांत्य फेरीची दोन महत्त्वाची समीकरणे
भारताने दोन्ही उर्वरित सामने जिंकल्यास
जर भारताने वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांना पराभूत केले, तर भारताचे 4 गुण होतील. मात्र, दक्षिण आफ्रिकेने त्यांचे उर्वरित सामने गमावले आणि इतर संघांचेही 4 गुण झाले, तर पुन्हा निर्णय नेट रन रेटवर (NRR) अवलंबून असेल.
भारताने एक सामना जिंकल्यास
जर भारत केवळ एकच सामना जिंकला, तर भारताचे २ गुण होतील. अशा वेळी भारताला दक्षिण आफ्रिकेने त्यांचे सर्व सामने जिंकावेत अशी प्रार्थना करावी लागेल. तसेच भारत, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज यांचे प्रत्येकी २ गुण होतील, ज्यामुळे नेट रन रेटच्या आधारावर एक संघ पुढे जाईल.
भारताचे आगामी सामने
- 26 फेब्रुवारी - भारत विरुद्ध झिम्बाब्वे
- 1 मार्च - भारत विरुद्ध वेस्ट इंडिज