Shocking Video : महामार्गावरील एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. राष्ट्रीय महामार्गावर दिवसाढवळ्या तीन मुली स्वत:चा जीव वाचविण्यासाठी आरडाओरडा करीत होत्या. मात्र काळ्या रंगाची स्कॉर्पियो काळ होऊन त्यांच्या मागे धावत होती. सूर्य मंदिराजवळ झालेल्या एका क्षुल्लक गाडीची धडक झाल्याने काही मिनिटात जीवघेणं रुप धारण केलं. पीडित मुलींचा आरोप आहे की, चूक नसतानाही स्कॉर्पियोमधील दोन मुलांनी त्यांना केवळ धमकीच दिली नाही तर कित्येक किलोमीटरपर्यंत त्यांचा पाठलाग केला आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे.
रोड रेजमुळे गाडीतील मुलींमध्ये घबराट...
मुलींनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा वाद वाढत असल्याचं दिसलं तेव्हा त्या तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र स्कॉर्पियोमधील मुलं त्यांचा पाठलाग करीत होते. महामार्गावर सुरू झालेली ही दहशत बराच काळ सुरू होती. महिलांची गाडी रोखण्याचा प्रयत्न केला जात होता. जीव वाचविण्यासाठी पीडित कार चालकाने चुकीच्या दिशेने रस्त्यावर गाडी आणली, मात्र तरीही अंगावर काटा आणणारा हा पाठलाग बंद झाला नाही.
पोलिसांना फोन केल्यानंतरही झाला हल्ला...
घाबरलेल्या तरुणीने दुपारी साधारण १२.३३ वाजता आपत्कालिन नंबर १०० वर फोन करून पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांना स्कॉर्पियोच्या नंबरसह संपूर्ण माहिती दिली. परंतु असा आरोप आहे की, पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच हल्लेखोरांनी दुपारी १२:४८ वाजता दशम धबधब्याजवळ त्यांची गाडी घेरली आणि थांबवली. त्या तरुणांनी आधी ड्रायव्हरच्या बाजूचा दरवाजा जबरदस्तीने उघडण्याचा प्रयत्न केला आणि त्यात अपयश आल्यावर एका मोठ्या दगडाने गाडीची काच फोडली, ज्यामुळे चालक रणवीर सिंग रक्तबंबाळ झाला.
ही घटना झारखंडची राजधानी रांचीच्या दशम फॉल परिसरात घडली. कारमध्ये बसलेल्या तिन्ही तरुणी मदतीसाठी आरडाओरडा करीत होती. मात्र महामार्गावर बराच काळापर्यंत कुणीही पुढे आलं नाही. काही वेळाने स्थानिक लोक जमा होऊ लागले तेव्हा आरोपी घटनास्थळाहून फरार झाले. या प्रकरणात पोलिसांच्या कामावर गंभीर सवाल उपस्थित केले जात आहेत.