एका ऑटो रिक्षातून चक्क 22 शाळकरी मुले त्यांच्या स्कूल बॅग्ससह खाली उतरताना पाहून तुम्हाला धक्का बसेल. पण, ही घटना खरी आहे. एका ऑटो रिक्षात एक-दोन नव्हे, तर तब्बल 22 विद्यार्थी बसलेले होते. वाहतूक पोलिसांनी (Traffic Police) जेव्हा या ऑटो रिक्षा चालकाला थांबवले, तेव्हा पोलिस अधिकाऱ्यालाही धक्का बसला. ही धक्कादायक घटना तेलंगणाच्या नगरकरनूल येथील आहे. खासगी शाळेचे विद्यार्थी या ऑटो रिक्षातून प्रवास करत होते. अशा पद्धतीने एकाच रिक्षात बावीस विद्यार्थी बसवले असल्याचं समोर येताच सर्वच जण हादरन गेले आहे. शिवाय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे काय असा प्रश्न ही निर्माण झाला आहे.
22 विद्यार्थ्यांचा व्हिडिओ झाला व्हायरल
पिवळ्या रंगाच्या ऑटो रिक्षात (Auto Rickshaw) अक्षरशः कोंबलेल्या या विद्यार्थ्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक-एक करून विद्यार्थी खाली उतरताना दिसत आहेत. हे सर्व विद्यार्थी शाळेच्या गणवेशात आहेत. यातील काही विद्यार्थी नर्सरीचे (Nursery) तर काही दुसरी आणि तिसरीच्या वर्गातील (Class 2 and 3) दिसत आहेत. वाहतूक पोलिस अधिकाऱ्याने ऑटो थांबवल्यानंतर, एक-एक करून सर्व मुलांना खाली उतरवण्यात आले. खाली उतरणाऱ्या मुलांची संख्या जेव्हा 22 पर्यंत पोहोचली, तेव्हा मोजणारेही थक्क झाले. ऑटोमध्ये तब्बल 22 विद्यार्थी त्यांच्या स्कूल बॅग (School Bag) आणि पाण्याच्या बॉटलसह (Water Bottle) प्रवास करत होते.
पालकांना धोका पत्करण्याची वेळ का?
हे सर्व विद्यार्थी तेलंगणाच्या नगरकरनूल येथील एका खासगी शाळेचे (Private School) असल्याचे सांगितले जात आहे. आता प्रश्न असा आहे की, खासगी शाळेच्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे ऑटो रिक्षात का कोंबले जात आहे? यामागचे कारण असे आहे की, राज्यातील बहुतांश खासगी शाळा स्कूल बसच्या (School Bus) नावाखाली खूप महागडे शुल्क (Expensive Fees) आकारतात. त्यामुळे, वाढलेल्या फीसह वाहतुकीचा हा मोठा खर्च अनेक पालकांना (Parents) परवडत नाही. हे या मागचे प्रमुख कारण सांगितले जात आहे.
पालक असं का करतात?
परिणामी, पालक आपल्या मुलांचा जीव धोक्यात घालूनही त्यांना ऑटो रिक्षातून शाळेत पाठवण्यास भाग पडत आहेत. तेलंगणामध्ये अशाप्रकारे क्षमतेपेक्षा जास्त मुलांना घेऊन जाणारे शेकडो ऑटो रिक्षा सकाळी आणि सायंकाळी रस्त्यावर धावताना दिसतात. ज्यात मुलांना जनावरांप्रमाणे कोंबले जाते. या गंभीर विषयाकडे राज्याच्या शिक्षण विभागाने (Education Department) तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. अशा प्रकार वाहतूक होणार असेल तर विद्यार्थ्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होवू शकतो. त्यामुळे वेळीच पावले उचलण्याची मागणी होत आहे.