उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात एक अजब घटना समोर आली आहे. आपल्याच पाळीव कुत्र्याने चावा घेतल्यामुळे उपजिल्हाधिकाऱ्यांनी (SDM) जिल्हाधिकाऱ्यांकडे सुट्टीची मागणी केली आहे. सध्या हे रजेचे पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. बैरिया येथील उपजिल्हाधिकारी आलोक प्रताप सिंह यांना त्यांच्या पाळीव कुत्र्याने जखमी केले आहे. त्यामुळे त्यांना दैनंदिन कामे करणेही कठीण झाले आहे. या घटनेनंतर उपजिल्हाधिकाऱ्यानी घेतलेल्या रजेची आता सर्वत्र चर्चा सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
ही घटना 5 मार्च रोजी उपजिल्हाधिकारी यांच्या शासकीय निवासस्थानी घडली. आलोक प्रताप सिंह यांचे वडीलही तिथेच होते. त्यांचा 'अमेरिकन बुली' जातीचा कुत्रा वडिलांना त्रास देत होता. वडिलांना कुत्र्यापासून वाचवण्यासाठी आणि कुत्र्याला पकडण्यासाठी जेव्हा उपजिल्हाधिकारी आलोक प्रताप सिंह पुढे सरसावले, तेव्हा त्याच कुत्र्याने त्यांच्यावर झडप घातली. कुत्र्याने त्यांच्या दोन्ही हातांना अत्यंत गंभीर चावा घेतला आहे. यामुळे खोल जखमा झाल्या असून रक्तस्राव थांबत नव्हता.

रजेच्या पत्रात काय म्हटले आहे?
आलोक प्रताप सिंह यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात आपली व्यथा मांडली आहे. त्यांनी लिहिले की, "पाळीव कुत्र्याने दोन्ही हातांना चावा घेतल्यामुळे खोल जखमा झाल्या आहेत. डॉक्टरांनी उपचार केले असले तरी रक्तस्राव थांबत नाहीये. मी माझ्या हाताने दैनंदिन कामे करण्यास आणि कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासही असमर्थ आहे. त्यामुळे 6 मार्च ते 13 मार्च अशी 8 दिवसांची रजा मंजूर करावी." रजेच्या अर्जावर देखील त्यांना सहीऐवजी अंगठा दिला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
जिल्हाधिकाऱ्यांनी एसडीएम आलोक प्रताप सिंह यांची परिस्थिती पाहून त्यांची 8 दिवसांची रजा तातडीने मंजूर केली आहे. मात्र, प्रशासकीय कामात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून त्यांच्या जागेवर दुसऱ्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडे तात्पुरता कार्यभार सोपवण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world