कतार या देशात भारतीय नागरिक असलेल्या एका इंजिनिअर तरुणाला अटक करण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्या पासून ते अटकेत आहे. त्यांचे आई वडील हे गुजरातच्या वडोदऱ्याचे राहाणारे आहेत. मुलाला अटक झाल्याने ते काळजीत आहेत. पण त्याच्या बरोबर नक्की काय होत आहे याची त्यांना काहीच कल्पना नाही. मुलाची सुटका व्हावी यासाठी आता ते विनवणी करत आहे. मुलाने काहीच चुक केली नाही तरी त्याला शिक्षा मिळत आहे असा आरोपही त्या इंजिनिअर तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
टेक महिंद्रा कंपनीत अमित गुप्ता हे काम करतात. त्यांची नियुक्ती कतार या देशात आहे. कतार आणि कुवैतची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. गेल्या काही वर्षापासून ते तिथं काम करतात. मात्र या जानेवारी महिन्यात कतारची राजधानी दोहा इथं त्यांना अटक करण्यात आली. डेटा चोरी केल्याचा आरोप गुप्ता यांच्यावर आहे. त्यामुळेच त्यांना अटक करण्यात आली आहे. महिंद्रा कंपनीने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. आम्ही गुप्ता यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहोत असं सांगण्यात आलं आहे.
चौकशीसाठी गुप्ता यांना ताब्यात घेतलं आहे हे टेक महिंद्राने मान्य केलं आहे. आम्ही त्यांना हवी ती मदत करत आहोत. शिवाय दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यां बरोबर आम्ही सतत संपर्कात आहोत. शिवाय कायद्या नुसार प्रक्रीयेचे पालन ही आम्ही करत असल्याचं कंपनीच्यावतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. गुप्ता यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी ही कंपनीची आहे. त्या दृष्टीने कंपनी प्रयत्न करत असल्याचं ही सांगण्यात आलं आहे.
मात्र जे आरोप अमित यांच्यावर लावण्यात आले आहेत ते त्यांच्या कुटुंबीयांनी फेटाळून लावले आहेत. अमित यांची आई पुष्पा गुप्ता यांनी न्यूज एजन्सी आईएएनएस बरोबर याबाबत प्रतिक्रीया दिली आहे. अमितला एक जानेवारीला अटक करण्यात आली. या बाबत आम्हाला काहीही माहिती नव्हती. आम्ही दोन दिवस सतत फोन करत होतो. पण त्याने फोन उचलला नाही. त्यानंतर त्याच्या मित्राकडून त्याला अटक झाली आहे याची माहिती आम्हाला मिळाली असं त्याच्या आईने सांगितलं. हे ऐकून आमच्या पाया खालची वाळू सरकली असंही त्या म्हणाल्या.
ट्रेंडिंग बातमी - Political news: 'जयंत पाटील किरकोळ माणूस', फडणवीसांचा लाडका आमदार 'हे' काय बोलला?
अमितला एक जानेवारीला अटक करण्यात आली. त्यानंतर 48 तास त्याला जेवण दिलं नाही. पाणी ही पिण्यासाठी देण्यात आलं नाही. शिवाय एका बंद खोलीत कोंडून ठेवण्यात आलं होतं, असा आरोपही त्याच्या आईने केला आहे. आता तीन महिने होत आहेत. तरी ही तो अटकेत आहे. कंपनीत कुणी काही तरी चुकीचं केलं असणार, आपला मुलगा रिजनल हेड आहे. त्यामुळे त्यालाच अटक करण्यात आली आहे. त्याची सुटका व्हावी यासाठी स्थानिक खासदार हेमंग जोशी यांची मदतही मागितल्याचं त्यांनी सांगितलं. सरकार या प्रकरणात लक्ष घालेल असं त्यांनी आश्वासन दिल्याचं त्या म्हणाल्या.
या आधी 2022 साली कतार मध्ये भारतीयांना अटक करण्यात आली होती. एका अधिकाऱ्यासाठी काही नौसेनेच्या कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना 2023 साली फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर कतारच्या एका कोर्टाने त्यांची शिक्षा कमी केली. फेब्रुवारी 2024 मध्ये कतारच्या राजाच्या आदेशाने त्या सर्वांना सोडून देण्यात आले होते. कतारचे कायदे कडक आहेत. त्यामुळेच गुप्ता परिवाराने मुलाच्या सुटकेसाठी सरकारकडे याचना केली आहे.