- लंडनमध्ये फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करणाऱ्या मानव शाह यांनी लाखोचे वेतन असूनही नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला
- त्यांना कामात स्वातंत्र्य नसल्यामुळे आणि बंदिस्त जागेत असल्यासारखे वाटल्यामुळे नोकरीमधून सुटका हवी होती
- कौटुंबिक ओढ आणि परदेशातील एकटेपणामुळे मानव शाह यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे
परदेशात स्थायिक होणे आणि तिथे लाखोंचे पॅकेज मिळवणे हे अनेकांचे स्वप्न असते. ते स्वप्न ज्याचे साकार होते त्यांना आकाश ठेंगणे होते. मात्र, लंडनमध्ये स्थायिक झालेल्या एका भारतीय तरुणाने या 'ड्रीम लाईफ'ला रामराम ठोकून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. मानव शाह असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्या या निर्णयाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. त्याने नोकरी सोडण्याचे कारण ही तेवढेच भन्नाट आहे. लंडनमध्ये सर्व काही सुरळीत सुरू असताना त्याने हा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयावर सोशल मीडियावर वेगवेगळी चर्चा होताना दिसत आहे. काहींनी त्याचे कौतूक केले आहे तर काहींनी चक्की त्याच्यावर टिकेची झोड उठवली आहे.
मानव शाह यांनी युके (UK) मध्ये फिजिओथेरपिस्ट म्हणून करिअरला सुरुवात केली होती. त्यांना वर्षाला 40 लाख रुपयांचे वेतन मिळत होते. वरवर पाहता सर्व काही सुरळीत आणि विलासी वाटत असले, तरी मानव यांना तिथे कामाचे स्वातंत्र्य जाणवत नव्हते. त्यांच्या मते, सकाळी 9 ते संध्याकाळी 5 च्या या नोकरीत त्याला एखाद्या बंदिस्त जागेत ठेवल्यासारखे जाणवत होते. कधी कधी आपण जेलमध्ये असल्यासारखे ही त्याला वाटत होते. एकीकडे त्यांची कोंडी होत होती. तर दुसरीकडे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची जिद्द त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.
केवळ व्यवसायच नाही, तर कौटुंबिक ओढ हे देखील मानव यांच्या भारतात परतण्यामागचे मोठे कारण ठरले. परदेशातील चकचकीत आयुष्यात येणारा एकटेपणा अत्यंत त्रासदायक असल्याचे त्यांनी सांगितले. किती ही चांगली नोकरी असेल. किती ही चांगला पगार असेल पण जर तुमच्या जवळ तुमचे कुटुंब नसेल तर त्याला काहीच अर्थ नाही असे त्याचे म्हणणे आहे. आई-वडील आणि मित्रपरिवारासोबत घालवलेला वेळ हा कोणत्याही परकीय चलनापेक्षा किंवा हाय-प्रोफाईल लाईफस्टाईलपेक्षा अधिक मौल्यवान असल्याचे त्यांचे मत आहे. त्यामुळे हे सर्व कुटुंबीय आणि मित्रांसमोर दुय्यम ठरतं अशी ही त्याची भावना निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांना हा मोठा निर्णय घेतला.
मानव यांने एका महत्त्वाच्या मुद्द्यावर प्रकाश टाकला आहो. तो म्हणजे 'कॉस्ट ऑफ लिव्हिंग. लंडनच्या तुलनेत भारतात राहणे अधिक परवडणारे आहे. इथे राहून कमी खर्चात जास्त बचत करणे शक्य आहे, असे त्यांनी नमूद केले. स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या माणसांच्या जवळ राहण्यासाठी त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्या या भूमिकेचे समर्थन केले असून, "यश म्हणजे केवळ पैसा नसून मानसिक समाधान महत्त्वाचे आहे," अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. व्यावसायिक स्वातंत्र्य आणि कौटुंबिक मूल्यांना प्राधान्य देत त्याने हा निर्णय घेतला आहे. लंडनमध्ये अलिशान आयुष्य आणि हातात लाखो रुपये खेळत असतानाही या तरुणाने भारतात परतण्याचा धाडसी निर्णय घेतला.