JD Vance तणावाचे रुपांतर आण्विक युद्धात होऊ नये अशी आशा! चर्चेद्वारे वाद मिटवण्याचा अमेरिकेचा सल्ला

India Pakistan Tension वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर हे विविध देशांच्या प्रमुखांशी, परराष्ट्रमंत्र्यांशी संवाद साधत आहेत. जयशंकर यांचा आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांचाही संवाद झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव हा जबरदस्त वाढला आहे. भारताने पाकिस्तानला सोडायचं नाही अशी भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला. जम्मू कश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये मोठी घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाला. भारताने पाकिस्तानचे सगळे प्रयत्न हाणून पाडले आहेत. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर हे विविध देशांच्या प्रमुखांशी, परराष्ट्रमंत्र्यांशी संवाद साधत आहेत. जयशंकर यांचा आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांचाही संवाद झाला. रुबियो यांच्यासह अमेरिकेच्या विविध नेत्यांनी तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले आहे. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी.वान्स यांनीही काहीशी तशीच भूमिका घेतली आहे मात्र आपण या वादात पडणार नाही असेही स्पष्ट केले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

वान्स यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी वान्स यांना प्रश्न विचारण्यात आला की, भारत आणि पाकिस्तानमध्ये आण्विक युद्ध भडकण्याची भीती कितपत वाटते आहे ? यावर उत्तर देताना वान्स यांनी म्हटले की, "हा तणाव लवकरात लवकर निवळावा अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही या दोन देशांना अधिक प्रवृत्त करू इच्छितो. मात्र तणावाच्या स्थितीत आम्ही यात पडू इच्छित नाही. अमेरिका भारत किंवा पाकिस्तानला शस्त्र टाका असे सांगू शकत नाही. आम्ही हा वाद चर्चेच्या मार्गाने सोडवला जावा या भूमिकेचे आहोत. हा तणाव अधिक चिघळू नये आणि आण्विक वादात त्याचे रुपांतर होऊ नये असे आम्हाला वाटते. आम्हाला या सगळ्याची चिंता वाटते. जर अणूयुद्ध झालं तर ते विनाशकारी ठरेल, मात्र असे होईल असं मला वाटत नाही. "

Advertisement

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी म्हटले की, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चर्चेद्वारे तणाव कमी करण्याचा दोन्ही देशांना सल्ला दिला आहे. ब्रूस यांनी पुढे म्हटले की अमेरिका दोन गोष्टींवर लक्ष केंद्रीत करून आहे, पहिली म्हणजे वाद वाढू नये आणि दुसरी म्हणजे संवाद साधावा.  भारत आणि पाकिस्तामधील स्थिती ही अत्यंत नाजूक आणि चिंताजनक असल्याते ब्रूस यांनी म्हटले. संवादाचे काही प्रयत्न सुरू आहेत मात्र त्याचा तपशील देता येणार नाही असेही त्यांनी म्हटले. 

Advertisement
Topics mentioned in this article