अविनाश पवार, प्रतिनिधी
Naneghat Incident Today : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ नाणेघाट येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या एका 22 वर्षीय तरुणाचा दाट धुक्यामुळे तोल गेला आणि तो खोल दरीत पडला. ही दुर्दैवी घटना आज रविवारी सकाळी घडली.या घटनेनंतर पोलिसांसह स्थानिक ग्रामस्थ आणि बचाव पथके तरुणाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
मात्र, सातत्याने सुरू असलेला पाऊस,दाट धुके आणि दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे शोधमोहीम आव्हानात्मक ठरत आहे. दत्ता विनायक लोंढे (वय 22,रा.पारगाव शिंगवे, ता. आंबेगाव,जि.पुणे) असं तरुणाचं नाव आहे. दत्ता त्याच्या आणखी तीन मित्रांसोबत वर्षा पर्यटनासाठी नाणेघाट येथे आला होता. सकाळच्या सुमारास परिसरात दाट धुके पसरलेले असताना कड्याजवळ फिरत असताना त्याचा तोल गेला आणि तो खोल दरीत पडला.
दरीत वाजतेय मोबाईलची रिंग
घटनेनंतर त्याच्या मित्रांनी आरडाओरडा करत स्थानिक नागरिकांची मदत घेतली आणि तातडीने पोलिसांना माहिती दिली.त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली.मात्र दरीची खोली,घसरडा परिसर आणि कमी दृश्यमानता यामुळे बचावकार्याला अडथळे येत आहेत.पोलिसांनी दत्ताच्या मोबाईल फोनचे लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला.मोबाईलवर रिंग जात असल्याने तो दरीतच असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
नक्की वाचा >> Rain Alert: मुंबई, ठाण्यात होणार अतिवृष्टी? रायगडलाही मुसळधार पाऊस झोडपणार, जुलैच्या 'या' तारखेला अलर्ट राहा
प्राथमिक माहितीनुसार,मोबाईलचे लोकेशन नाणेघाटाच्या खालच्या बाजूला असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या दिशेने दिसून आले आहे.त्यामुळे वरच्या बाजूने दरीत उतरण्याऐवजी ठाणे जिल्ह्याच्या बाजूने बचाव पथक पाठविण्याची तयारी सुरू आहे.त्या मार्गाने पोहोचल्यास युवकाचा शोध घेणे तुलनेने सोपे जाईल,असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
रेस्क्यू पथक घटनास्थळी पोहोचले
घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून स्थानिक प्रशासन,ग्रामस्थ आणि बचाव यंत्रणा समन्वयाने काम करत आहेत.अधिकृत रेस्क्यू पथक घटनास्थळी पोहोचत असून त्यानंतर शोधमोहीम आणखी वेगाने राबवण्यात येणार आहे.पावसाळ्यात नाणेघाट परिसरात दरवर्षी हजारो पर्यटक वर्षा पर्यटनासाठी येतात.
नक्की वाचा >> Pune News : पुण्यात कुठे मिळतं फक्त 10 रुपयात इडली सांबार, तुम्हाला माहितेय का?
दाट धुके,घसरडे कडे,खोल दऱ्या आणि सुरक्षिततेकडे होणारे दुर्लक्ष यामुळे अशा दुर्घटना वारंवार घडत आहेत.त्यामुळे प्रशासनाकडून पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे,सेल्फी किंवा अतिसाहस करू नये आणि हवामानाचा अंदाज घेऊनच पर्यटनाला जावे,असे आवाहन करण्यात येत आहे.दरम्यान,तरुणाचा शोध सुरू असून बचावकार्याबाबतची अधिकृत माहितीचे अपडेट दिले जाणार आहेत.