Purandar 3 People Death News : पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे मशरूम कंपनीतून येणाऱ्या पाण्याचे ड्रेनेज आणि टाकी साफ करण्यासाठी गेलेल्या तिघांचा मृत्यू झाला आहे.आज दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मृत्यू झालेले तिघेही कामगार हे उत्तर प्रदेश मधील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पिंटू राजेश प्रसाद (वय 23 रा.खोराराम ता.जि.देविरया,व्यास सोहम कुमार (वय 22 रा.नवतम,उत्तर प्रदेश) आणि गौतम रामसुरन कुशवाहा (वय 36 रा.मेदनापूर उत्तर प्रदेश) अशी मृतांची नावे आहेत.
साठलेल्या गॅसमुळे हे कर्मचारी बेशुद्ध पडले अन्..
टाकीत आतमध्ये उष्णतेमुळे गॅस तयार होऊन साठलेल्या गॅसमुळे हे कर्मचारी बेशुद्ध पडून जागीच मृत्यू पावल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास केला जात आहे. जेजुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज रविवारी 26 एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पुरंदर तालुक्यातील बेलसर येथील वाडा ऍग्रो मशरूम कंपनी ही घटना घडली आहे.
नक्की वाचा >> Mumbai Pune Expressway: मिसिंग लिंकचा मुहूर्त ठरला, टोलबाबत मोठा निर्णय, अपघात अन् विलंबाला कायमचा ब्रेक
मशरूम कंपनीतून येणाऱ्या पाण्याचे ड्रेनेज आणि टाकी साफ करण्यासाठी एक कर्मचारी खाली उतरला.मात्र बराच वेळ तो बाहेर आला नाही. तो वर येत नाही हे पाहता दुसरा कर्मचारी खाली उतरला. त्यानंतर ते दोन्ही कर्मचारी वर येत नाही हे पाहून परत एक कर्मचारी खाली उतरला.ते तिन्ही कर्मचारी बराच वेळ वर आले नाहीत.हे पाहून शेजारील काही व्यक्तींनी तात्काळ जेसीबीच्या साह्याने ड्रेनेजवरील स्लॅब फोडला आणि आतमध्ये अडकलेल्या या तिन्ही कर्मचाऱ्यांना त्यांनी बाहेर काढले.त्यांना जेजुरी ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी नेले असता,डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले आहे.