Ajit Pawar Death News: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन होऊन सात दिवस झाले आहेत. तरीही या गोष्टीवर कोणाचाही विश्वास होत नाही. अजित पवार यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह सर्वसामान्यांनाही मोठा धक्का बसलाय. या धक्क्यातून लोकांना सावरणं कठीण होतंय. अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनीही सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत. जय पवार यांनी अजित पवारांसोबतचे खास फोटो शेअर करत म्हटलंय की, "तुमची खूप आठवण येतेय. डॅड काश वेळ थांबली असती, मी तुम्हाला घट्ट मिठीत घेऊन आयुष्यभर तसाच राहिलो असतो." आयुष्यात वडिलांची निर्माण झालेली पोकळी भरून निघणे अशक्य आहे.
(नक्की वाचा: Ajit Pawar Video: अजित पवारांना असे पाहून रडू आवरणार नाही, जय पवार यांनी शेअर केला स्तब्ध करणारा व्हिडीओ)
अजित पवार यांचे अपघाती निधन
अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 सकाळी विमान अपघातात निधन झाले. मुंबईहून बारामतीच्या दिशेने प्रवास करताना त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड होऊन ते खाली कोसळले. विमान जमिनीवर आदळल्यानंतर त्याचा मोठा स्फोट झाला आणि या दुर्घटनेत अजित पवार यांचे जागीच निधन झाले. 29 जानेवारी रोजी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान कॉलेजच्या प्रांगणात अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
हात जोडून सर्वांना विनंती करतो : रोहित पवार
राशपचे आमदार राोहित पवार यांनी नेतेमंडळी आणि जनतेला आपले काका अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय चर्चांपासून दूर राहण्याचे आवाहन केलेय. रोहित पवार यांनी X वर पोस्ट करत म्हटलंय की," माननीय अजितदादा गेल्यापासून अनेकजण राजकीय चर्चा करताना दिसतायत, पण आज कोणत्याही राजकीय चर्चेपेक्षा मा. अजितदादांच्या जाण्याच्या दुःखाची व्याप्ती कितीतरी पट मोठी आहे. मा. अजितदादा आपल्यात असते तर चित्र वेगळं असतं आणि दादांशिवाय कुणीही त्यावर चर्चाही केली नसती, पण आज दादाच आपल्यात नाहीत. त्यांचं जाणं हे आपल्या सर्वांवरच आभाळ कोळसल्यासारखं आहे आणि अशा वातावरणात कुणीही राजकीय चर्चा करणं योग्य वाटत नाही. त्यामुळं पवार कुटुंबातील एक सदस्य म्हणून माझी सर्वांनाच हात जोडून विनंती आहे की, दादांच्या आत्म्याला क्लेश होईल, त्यांच्या विचारांना ठेच पोचेल आणि त्यांच्या स्पष्ट व परखड स्वभावाला साजेसं वाटणार नाही असं तूर्तास तरी कुणीही न बोलणंच अधिक योग्य ठरेल. भविष्यात यथावकाश चर्चा करायला काही अडचण नाही पण त्यासाठीची योग्य वेळ आज नाही, हे सर्वांनीच लक्षात घेण्याची गरज आहे…!"