देवा राखुंडे, बारामती
Ajit Pawar Plane Crash: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला होता. या अपघाताबाबत आता एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपघाताच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने आपला प्राथमिक अहवाल सादर केला असून, यामध्ये वैमानिकाचा अंदाज चुकल्याचे आणि तांत्रिक बिघाड झाल्याचे प्राथमिक निष्कर्ष नोंदवण्यात आले आहेत. प्राथमिक तपासानुसार, हा अपघात केवळ एका कारणामुळे नाही तर अनेक तांत्रिक आणि मानवी त्रुटींच्या साखळीमुळे झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अपघात नेमका कसा झाला?
लँडिंगचा 'अँगल' चुकला
विमानाने धावपट्टीवर उतरण्यासाठी (Landing) जेव्हा शेवटचा प्रयत्न केला, तेव्हा त्याचा अँगल चुकला होता. दृश्यास्पदतेच्या अभावामुळे वैमानिकाला धावपट्टीचा अचूक अंदाज आला नाही. परिणामी, विमान धावपट्टीच्या मध्यभागी उतरण्याऐवजी बाजूला जाऊन आदळले.
(नक्की वाचा- VIDEO: 'दादांची आठवण उडत उडत पायाजवळ', तरुणीला घटनास्थळी सापडला 'असा' कागद; 80 लाख लोकांनी पाहिला व्हिडिओ)
तांत्रिक बिघाड
विमान लँडिंगच्या स्थितीत असताना त्याच्या नियंत्रण प्रणालीमध्ये किंवा इंजिनमध्ये अचानक बिघाड झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या बिघाडामुळे शेवटच्या क्षणी विमान अस्थिर झाले असावे. इंजिनमध्ये निर्माण झालेल्या समस्येमुळे वैमानिकाला विमानावर नियंत्रण मिळवणे कठीण झाले. धावपट्टीच्या दिशेने कूच करत असताना विमानात निर्माण झालेली अस्थिरता अपघातास कारणीभूत ठरली.
(नक्की वाचा- Pune-Mumbai Expressway वरील टँकर हटवला मात्र कोंडी कायम; नव्या अडचणीमुळे पोलीसही हतबल)
प्रशासकीय हालचाली आणि पुढील चौकशी
हा प्राथमिक अहवाल असून सविस्तर चौकशी अद्याप सुरू आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) आणि इतर सुरक्षा यंत्रणा विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचा डेटा अधिक बारकाईने तपासत आहेत. या अहवालातील निष्कर्षांमुळे विमानांच्या देखभालीवर आणि सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.