योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola Child Marriage Viral News : अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील बाभुळगाव येथे होणारा बालविवाह पातुर पोलीस आणि अकोला बाल कल्याण समितीच्या संयुक्त कारवाईत रोखण्यात आला. 16 एप्रिल रोजी हा विवाह होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ याची दखल घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पातुर पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि बाल कल्याण समितीच्या सदस्यांनी संयुक्त पथक तयार करून घटनास्थळी धाव घेतली.वेळेत पोहोचल्यामुळे मोठा सामाजिक गुन्हा टळला असून प्रशासनाच्या सतर्कतेचे यावेळी विशेष कौतुक केले जात आहे.
मुलगी अल्पवयीन असल्याची खात्री करून विवाह थांबवला
पथक बाभुळगाव येथे पोहोचल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम मुलीच्या जन्मतारखेची पडताळणी केली. तपासादरम्यान संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर ज्या ठिकाणी विवाह सुरू होता.तेथे जाऊन अधिकाऱ्यांनी तात्काळ विवाह थांबविण्याची कारवाई केली.कायद्याचे उल्लंघन होऊ नये यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली. या कारवाईमुळे बालविवाहासारख्या गंभीर सामाजिक समस्येला आळा बसण्यास मदत झाली असून अशा प्रकारच्या घटनांवर प्रशासन सतत लक्ष ठेवून असल्याचा संदेशही समाजात गेला.
नक्की वाचा >> Kalyan News: कल्याण-डोंबिवलीत भीषण पाणीटंचाई, 100 रुपयांत चार हंडे विकत घेण्याची वेळ, "ते पाणी गढूळ.."
पालकांना कायद्याबाबत मार्गदर्शन
विवाह थांबवल्यानंतर पथकाने बालिका आणि तिच्या पालकांशी सविस्तर संवाद साधला.त्यांना बालविवाह प्रतिबंधक कायदा,2006 अंतर्गत असलेल्या तरतुदी आणि त्याचे परिणाम याबाबत माहिती देण्यात आली.बालविवाहाचे दुष्परिणाम मुलींचे शिक्षण आणि आरोग्य यांचे महत्त्व याविषयीही समजावून सांगण्यात आले.प्रशासनाचा उद्देश केवळ कारवाई करणे नसून जनजागृती करून समाजात सकारात्मक बदल घडवणे हा असल्याचे या माध्यमातून अधोरेखित झाले.
नक्की वाचा >> "हिंदू असल्याचा अभिमान..", नमाज पठणावरून ट्रोल झालेल्या नमिता थापर म्हणाल्या, "आय डोंट केअर..", Video व्हायरल
अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी मोहीम
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक,अपर पोलीस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.पातुर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक हणमंत डोपेवाड,पोलीस कर्मचारी शंकर बोरकर,साई नवले तसेच बाल कल्याण समितीच्या प्रांजली जयस्वाल,सुनील लाडुरकर आणि सुनील सरकटे यांनी संयुक्तपणे ही कारवाई यशस्वी केली.प्रशासनाच्या या समन्वयातून बालविवाह रोखण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे.