राहुल वाघ, अहिल्यानगर
Ahilyanagar Nagar: भोंदू अशोक खरात प्रकरणाचा तपास आता थेट प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला आहे. खरातच्या मुलीच्या लग्नसोहळ्यात हजेरी लावणाऱ्या हाय-प्रोफाईल पाहुण्यांची कुंडली आता विशेष तपास पथकाने (SIT) काढायला सुरुवात केली आहे. यामध्ये अनेक वरिष्ठ सनदी अधिकारी आणि पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.
IAS आणि IPS अधिकारी वऱ्हाडी
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरातच्या मुलीचा विवाह सोहळा अत्यंत शाही थाटात पार पडला होता. या सोहळ्यात केवळ हजेरीच नाही, तर अनेक अधिकारी पूर्णवेळ उपस्थित होते. नाशिक, अहिल्यानगर, मुंबई आणि थेट दिल्लीवरून आलेले IAS आणि IPS अधिकारी या लग्नात वऱ्हाडी म्हणून मिरवत होते.
(नक्की वाचा- Commercial LPG Cylinder: महागाईचा भडका! एलपीजी सिलेंडरच्या किमतीत पुन्हा मोठी वाढ)
सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही गटांतील प्रमुख नेत्यांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. खरातच्या संबंधांचे जाळे इतके विस्तारलेले होते की, या लग्नात काही परदेशी नागरिकही उपस्थित असल्याचे एसआयटीच्या निदर्शनास आले आहे.
एसआयटीचा 'मास्टर प्लॅन' काय?
तपास यंत्रणांना संशय आहे की, खरातने आपल्या भोंदूगिरीच्या साम्राज्याला संरक्षण मिळवण्यासाठी या अधिकाऱ्यांचा वापर केला असावा. एसआयटीने लग्नसोहळ्याचे व्हिडिओ फुटेज आणि फोटोंवरून उपस्थित अधिकाऱ्यांची एक सविस्तर यादी तयार केली आहे. हे अधिकारी केवळ पाहुणे म्हणून गेले होते की त्यांचे खरातशी काही आर्थिक हितसंबंध होते, याचा तपास आता सुरू झाला आहे. परदेशातून आलेल्या पाहुण्यांची पार्श्वभूमी आणि त्यांच्यामार्फत काही काळा पैसा पांढरा झाला का? याचीही चौकशी होऊ शकते.
(नक्की वाचा- Chhatrapati Sambhajinagar News: अजिंठा लेणी पाहायला गेलेल्या पर्यटकांचा अचानक पळापळ, 11 पर्यटक जखमी)
प्रशासकीय वर्तुळात खळबळ
काही वरिष्ठ अधिकारी या लग्नात 'पूर्णवेळ' उपस्थित होते, ही बाब एसआयटीच्या तपासात गंभीर मानली जात आहे. एका गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीच्या कौटुंबिक कार्यक्रमात जबाबदार पदांवरील व्यक्तींनी इतका वेळ घालवणे हे त्यांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे. लवकरच यातील काही 'व्हीआयपी' वऱ्हाड्यांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे.