Kalyan Market Viral Video : कल्याण पश्चिमेत रौनक सिटी परिसरात आठवडी बाजार भरवला जातो. या आठवडी बाजारामुळे प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होते. यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. रहिवाशांनी याच्या विरोधात वारंवार तक्रार केली आहे. परंतु, या समस्येकडे प्रशासनाने दुर्लक्षच केलं आहे. आजही आठवडी बाजार भरला होता. केडीएमसी अधिकारी त्यांच्या कर्मचाऱ्यांसोबत या बाजारात पोहोचले. तेव्हा केडीएमसी महिला सहाय्यक आयुक्त प्रीती गाडे आणि बाजार लावणाऱ्या विक्रेत्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर केडीएमसीच्या अधिकाऱ्यांवर विक्रेत्यांना अक्षरक्ष: विनवणी करण्याची वेळ आली. हा व्हिडीओ आता प्रचंड व्हायरल होत आहे.
कल्याण डोंबिवलीत फेरीवाल्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. काही दिवसापूर्वी डोंबिवलीत स्टेशन परिसरात फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. कल्याणमध्ये परिस्थिती जैसे थे आहे. स्टेशन परिसरात फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे. त्यामुळे स्टेशन परिसरात देखील वाहतूक कोंडी होते. नागरिकांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.
नक्की वाचा >> Dadar Station Video : दगडफेकीच्या घटनेनंतर आज पुन्हा दादर स्टेशन परिसरात प्रवाशांमध्ये घबराट, मोठा अनर्थ टळला
आठवडी बाजारामुळे वाहतूक कोंडीची समस्या
फेरीवाल्यांच्या विरोधात महापालिका कोणतेही पाऊल उचलत नाही. फेरीवाल्यांना विरोध केला, तर फेरीवाल्यांकडून आक्रमक पवित्रा घेऊन मारहाण केली जाते. कल्याण रौनक सिटी परिसरात आठवडी बाजार भरतो. या बाजाराला अनेकांचा विरोध आहे. तरीही हा बाजार भरतो. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
इथे पाहा आठवडी बाजाराचा व्हायरल व्हिडीओ
— Naresh Shende (@NareshShen87640) March 28, 2026
याच कारणामुळे पालिका प्रशासनाकडे मार्केटबाबत तक्रार करण्यात आली. त्यानंतर पालिकेच्या सहाय्यक आयुक्त प्रीती गाडे कारवाई पथकासह त्या ठिकाणी पोचल्या. त्यावेळी विक्रेते आणि अधिकारी यांच्यात वाद झाला. बाजार भरवू नका म्हणून अधिकारी त्यांना विनवणी करत होते. परंतु, साई चौक परिसरात बसलेल्या फेरीवाल्यांवर धडक कारवाई करण्यात आली. यावरून महापालिकेचे दुटप्पी धोरण दिसून येत आहे.
नक्की वाचा >> Mumbai News: गणेश मूर्तिकारांसाठी गुड न्यूज! मंडपांसाठी BMC चे नवे नियम, 2026 चं परिपत्रक वाचलं का?
मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी महापालिका कारवाई करताना दुजाभाव का करते ? असा सवाल उपस्थित केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या महासभेत फेरीवाल्यांचा विषय घेण्यात आला होता. त्यावर चर्चा होऊन देखील फेरीवाल्यांवर महापालिका प्रशासनाकडून कारवाई केली जात नाही, हेच आठवडी बाजारच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world