
मुंबईला पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या टँकर चालकांनी संप पुकारला होता. टँकर असोसिएशनचा संप गेल्या पाच दिवसापासून सुरू आहे. तो अखेर सोमवारी म्हणजे पाचव्या दिवशी मागे घेण्यात आला. त्यामुळे मुंबईकरांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे. अनेक इमारती आणि अस्थापनाना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. पण गेल्या पाच दिवसापासून त्यांची गैरसोय होत होती. पाणी नसल्यामुळे अनेक ठिकाणी पाणीबाणी निर्माण झाली होती. मात्र मुंबई महापालिका आणि टँकर असोसिएशन यांच्यात झालेल्या बैठकीनंतर या संपावर तोडगा काढण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या प्रयत्नाने टँकर असोसिएशनने संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे अशी घोषणा आमदार मुरजी पटेल यांनी केली. टँकर असोसिएशनचे म्हणणे सरकारने ऐकून घेतले आहे. टँकर असोसिएशनला ज्या नोटीस दिल्या होत्या, त्या सर्व मागे घेण्यात येत आहेत, असं ही पटेल यांनी स्पष्ट केलं. शिवाय कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नसल्याचे आश्वासन मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहे असं ही पटेल यांनी यावेळी सांगितलं.
त्यानंतर टँकर असोसिएशनचे पदाधिकारी राजेश ठाकूर यांनी आम्ही संप मागे घेत आहोत अशी घोषणा केली. आम्हाला पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आश्वासन दिले आहे. आमच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई करणार नाही. त्यामुळे आमचे समाधान झाले आहे. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यावरून तुम्हाला तात्काळ पाण्याने भरलेले टँकर दिसतील. आम्ही संप मागे घेत असून तात्काळ गाड्या चालू करत आहोत असे ठाकूर यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय भुजल प्राधिकरणाच्या नव्या धोरणाला टँकर असोसिएशनचा विरोध होता. नव्या धोरणानुसार विहीर, बोरवेल मालकाला प्रति टँकर 100 रुपये रॉयल्टी ही केंद्राला द्यावी लागणार होती. दिवसाला 15 टँकर गृहीत धरून वर्षासाठी 5 लाख 47 हजार 500 रुपये केंद्राला द्यावे लागणार होते. यासोबत वर्गवारीनुसार मुंबई महानगरपालिकेला देखील 5000 ते 15000 पर्यंतचा शुल्क द्यावा लागतो. ज्या ठिकाणी टँकर भरले जाणार त्या ठिकाणी टँकरच्या पार्किंगची व्यवस्था असावी. रस्त्यावर टँकर भरता येणार नाही, अशा अटी त्यात होत्या.केंद्र सरकारची परवानगी घेण्याला टँकर चालकाचा आक्षेप नाही, मात्र पार्किंगची अट शिथिल करावी आणि मुंबईत सिंगल विंडो कार्यालय असावे ही असोसिएशनची मागणी होती.
मुंबई शहरात 2500 ते 300 इतकेच टँकर सध्या अधिकृत असल्याचे सांगितले जात आहेत. प्रत्यक्षात या टँकरची संख्या 40 ते 50 हजार असल्याचे सांगितलं जात आहे. यामुळे अनेक ऑफिसेस, बांधकाम साईट्स येथील कामांवर परिणाम झाला होता. तसेच अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पुरवठा केला जात होता. मात्र हाच पर्याय बंद असल्याने नागरिकांचेही प्रचंड हाल झाले होते. त्यांना आता दिवासा मिळणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world