राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. राज्याच्या राजकारणात भाजप आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये टोकदार संघर्ष पाहायला मिळत आहे. मात्र छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद पंचायत समिती*मध्ये या दोन्ही पक्षांनी चक्क एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे. या 'अजब' युतीमुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
सत्तेचे नवे समीकरण
खुलताबाद पंचायत समितीच्या रिक्त पदांसाठी झालेल्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजपच्या सुनीता संजय खंडागळे यांनी सभापती पदाच्या निवडणुकीत बाजी मारली. त्यांना उद्धव ठाकरे गटाने पाठिंबा दिल्याने त्यांची निवड सुलभ झाली. सत्तेच्या वाटणीनुसार उपसभापती पद उद्धव ठाकरे गटाकडे गेले. मंदाबाई बद्रीनाथ वाकळे यांची या पदावर वर्णी लागली आहे.
(नक्की वाचा- Iran War Crises: सिलेंडरच्या किंमती 3000 रुपयांवर! मुंबईतील हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर)
अनेकांच्या भुवया उंचावल्या
राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अटीतटीचा संघर्ष सुरू असताना, खुलताबादमध्ये मात्र वेगळेच चित्र दिसले. स्थानिक पातळीवरील प्रस्थापित नेत्यांना शह देण्यासाठी किंवा सत्तेचे समीकरण जुळवण्यासाठी दोन्ही पक्षांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर एकमेकांवर टोकाची टीका केली जात असताना, स्थानिक पातळीवर मात्र दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकत्र जल्लोष करताना दिसले.
(नक्की वाचा- Nashik Crime: 'हनीट्रॅप'मध्ये अडकवून ब्लॅकमेल; नाशिकच्या तरुणाला 53 लाखांचा गंडा)
खुलताबादमधील या युतीमुळे इतर स्थानिक पक्ष आणि अपक्ष उमेदवारांची मोठी कोंडी झाली आहे. या निवडणुकीच्या निकालाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या राजकारणात आगामी काळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही युती केवळ या निवडणुकीपुरती आहे की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही कायम राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.