BMC Election News: मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर मालाड पूर्व येथील प्रभाग 39 मध्ये 17 जानेवारी रोजी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक संघर्ष झाला. काँग्रेस उमेदवार मधू ब्रिजेश सिंह यांच्या पराभवाचा राग मनात धरून त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कार्यालयाची तोडफोड केल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी अटकेची कारवाई केली आहे.
वादाचे नेमके कारण काय?
मालाड प्रभाग 39 मध्ये झालेल्या चौरंगी लढतीत शिवसेना (UBT) च्या पुष्पा कांबळे विजयी झाल्या. या निवडणुकीत काँग्रेसच्या मधू सिंह दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या. मधू सिंह यांचे पती ब्रिजेश सिंह यांचा असा आरोप होता की, राष्ट्रवादीच्या उमेदवार सुमन सिंह यांनी निवडणूक लढवल्यामुळे मतांचे विभाजन झाले आणि त्यामुळेच त्यांच्या पत्नीचा पराभव झाला.
(नक्की वाचा- BMC Top 10 Richest Corporators: श्रीमंत महापालिकेतील 'कुबेर'! टॉप 10 नगरसेवकांची कोट्यवधींची संपत्ती)
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिजेश सिंह, त्याचा भाऊ सर्वेश सिंह आणि डझनभर समर्थकांनी राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयावर हल्ला केला. यावेळी त्यांनी सुमन सिंह, त्यांचे कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचाही आरोप आहे. ब्रिजेशने सुमन यांना उद्देशून म्हटले की, "जर तुम्ही निवडणूक लढवली नसती, तर माझी पत्नी जिंकली असती."
कुरार पोलिसांत दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल
मिड डेच्या वृ्त्तानुसार, सुमन सिंह यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ब्रिजेश सिंह आणि त्याचा भाऊ सर्वेश सिंह यांना अटक केली आहे. आरोपींना स्थानिक न्यायालयात हजर केले असता, त्यांना 20 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
(नक्की वाचा- मुंबईत उभारले जाणार 30 मजली 'बिहार भवन'; जागा आणि बजेटही ठरले)
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिजेश सिंह हा माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांच्या हत्या प्रकरणातील देखील आरोपी आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडे यांनी सांगितले की, या प्रकरणातील इतर 7 ते 9 फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास कुरार पोलीस करत आहेत.