विशाल पाटील, प्रतिनिधी
BMC School : राज्यात सध्या हिंदी सक्तीच्या विषयावर चांगलाच वाद पेटला आहे. मात्र या हिंदी सक्तीच्या बरोबरच मराठी शाळांची मुंबईतील अवस्था काय आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. एकाच वर्गात पहिली ते सातवीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. काही शाळांमध्ये एकच शिक्षक सातवीपर्यंत शिकवतो. मुंबई शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजे दादरमध्ये मराठी शाळेचं रुपांतर चक्क कपड्यांच्या दुकानात झालं आहे. महापालिकेच्या मराठी शाळांचे वास्तव NDTV मराठी ने समोर आणलं आहे.
दादर-नायगाव हा मुंबईचा मध्यवर्ती भाग हा मराठी चळवळीचे केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. या भागात मराठी नागरिकांची संख्या मोठी आहे. मराठीच्या प्रश्नांवर राजकारण करणाऱ्या प्रादेशिक पक्षांचा जन्मही याच भागात झाला. पण, येथील एका शाळेत चक्क कपड्यांची दुकानं उघडली आहेत. नायगावमधील सरस्वती शाळेचं हे चित्र आहे. या शाळेत विद्यार्थीच येत नाहीयत. त्यामुळे शाळेला टाळं लागलं आहे. हे कमी की काय आता शाळेच्या तळमजल्यावर कपड्यांची दुकानं उघडण्यात आली आहेत.
( नक्की वाचा : BMC Election : भाषावादाचं राजकारण तापलं, पण मुंबईकर का आहेत नाराज? वाचा Ground Report )
दादरमधल्या महापालिकेच्या या मराठी शाळेत एकाच वर्गात पहिली ते सातवीचे विद्यार्थी शिकतायत. मराठी माध्यमाच्या या शाळेत विद्यार्थीसंख्या एवढी कमी आहे की एकाच वर्गात सगळ्या पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना एकत्र बसवण्याची वेळ आली आहे. सात इयत्तांना एकाच वेळी शिक्षक कसे शिकवतात आणि विद्यार्थी तरी एकाच वर्गात बसून कसे शिकतात, हे त्या विद्यार्थ्यांनाच ठाऊक....आणि अशा प्रकारे विद्यार्थ्यांना काय शिक्षण मिळणार, याबद्दल प्रश्नचिन्हच आहे.
गेल्या 13 वर्षात महापालिकेच्या 131 मराठी शाळा झाल्या बंद झाल्या
मराठी शाळेतल्या विद्यार्थ्यांमध्ये 45 टक्के घट झालीय
2019 मध्ये मुंबईत 283 मराठी शाळा होत्या, तर 1721 शिक्षक होते
2020 मध्ये हीच संख्या 279 झाली तर शिक्षकांची संख्या 1583 झाली
2021 मध्ये मराठी शाळा उरल्या 271 तर शिक्षक उरले 1367
2022 ला मराठी शाळांची संख्या होती 265 तर शिक्षक संख्या होती 1149
2023 मध्ये मराठी शाळा राहिल्या 262 तर शिक्षक उरले 1011
गेल्यावर्षी मुंबईतल्या मराठी शाळांची संख्या होती 254 तर शिक्षक संख्या होती 926
( नक्की वाचा : BMC Election : मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर ! 'हे' कारण ठरणार अडथळा )
इंग्रजी माध्यमांबद्दलचं प्रेम, मराठी शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांची नसलेली इच्छा आणि मराठी शाळा वाचवण्याची राजकीय नेत्यांची नसलेली इच्छाशक्ती यामुळे मराठी शाळा बंद होत आहेत. मराठी किंवा मातृभाषेतून शिक्षणाला सुरुवातीपासून प्रोत्साहनच दिलं नाही, आणि त्याचवेळी अनेक इंग्रजी शाळांना परवाने दिले गेले त्यामुळे नामांकित मराठी शाळाही बंद पडल्या. एकीकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळतोय आणि दुसरीकडे महाराष्ट्रातल्या मराठी शाळा बंद होतायत, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे.