Borivali to Panvel Direct Local: मुंबईकरांच्या रोजच्या प्रवासातील सर्वात मोठा अडथळा लवकरच दूर होणार असून पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक सुखावह बातमी समोर आली आहे. बोरिवलीत राहणाऱ्या आणि नवी मुंबई किंवा पनवेलला जाणाऱ्या प्रवाशांना आता गाड्या बदलण्याचा आणि गर्दीचा त्रास सहन करावा लागणार नाही. रेल्वेने हार्बर मार्गाचा थेट बोरिवलीपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतल्याने मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नकाशात एक मोठा बदल होणार आहे. या नवीन निर्णयामुळे मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ वाचणार असून एका टोकावरून दुसऱ्या टोकाला जाणे अधिक सोयीचे होणार आहे.
बोरिवलीकरांचा प्रवास होणार सुखकर
सध्या हार्बर रेल्वेची सेवा केवळ गोरेगाव स्थानकापर्यंतच उपलब्ध आहे. त्यामुळे मालाड, कांदिवली आणि बोरिवली येथील प्रवाशांना जर नवी मुंबई, सीएसएमटी किंवा पनवेलला जायचे असेल, तर त्यांना आधी गोरेगावला यावे लागते किंवा दादर आणि कुर्ला यांसारख्या गर्दीच्या स्थानकांवर गाड्या बदलाव्या लागतात.
मात्र, आता हार्बर मार्गाचा विस्तार थेट बोरिवलीपर्यंत होणार असल्याने प्रवाशांना बोरिवलीवरून थेट पनवेल, वांद्रे, वडाळा आणि सीएसएमटी गाठता येईल. या प्रकल्पामुळे पश्चिम रेल्वेवरील सध्याचा ताण लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होणार आहे.
( नक्की वाचा : पनवेलकरांची बल्ले बल्ले! कर्जत अवघ्या काही मिनिटांवर; नवा रेल्वे मार्ग ते पार्किंगपर्यंत सगळं काही 'अपडेट' )
प्रकल्पासाठी कोट्यवधींचा खर्च
पनवेल-बोरिवली-वसई उपनगरी रेल्वे मार्ग (MUTP-3B) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा हा एक भाग असून राज्य सरकारने या विस्ताराला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी एकूण 898.29 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये तांत्रिक आणि पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाणार आहे. अभियांत्रिकी कामासाठी 727.64 कोटी रुपये, विद्युत कामांसाठी 88.33 कोटी रुपये आणि सिग्नलिंग तसेच दूरसंचार यंत्रणेसाठी 82.31 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या निधीतून नवीन रुळ टाकणे आणि स्थानकांवरील तांत्रिक बदल पूर्ण केले जातील.

मुंबईकरांची त्रासातून सुटका
सध्या बोरिवलीहून पनवेलला जाण्यासाठी प्रवाशांना विविध कसरती कराव्या लागतात. प्रवाशांना एकतर दादरला जाऊन तिथून मध्य रेल्वेची गाडी पकडावी लागते किंवा अंधेरी-वांद्रे येथे जाऊन हार्बर रेल्वेची गाडी पकडावी लागते. दादर आणि कुर्ला यांसारख्या स्थानकांवरील तुफान गर्दीतून प्रवास करताना मुंबईकरांचे मोठे हाल होतात. हार्बर लाईन बोरिवलीपर्यंत आल्यास हा गाड्या बदलण्याचा त्रास कायमचा मिटणार आहे. यामुळे प्रवाशांना एकाच गाडीत बसून थेट नवी मुंबई गाठता येईल, ज्यामुळे त्यांचा किमान 20 ते 30 मिनिटांचा वेळ वाचू शकतो.
( नक्की वाचा : सातबारा कोरा होणार! शेतकरी कर्जमाफीचे स्वरूप नक्की काय? कोणाचे कर्ज होणार माफ? वाचा 'A to Z' माहिती )
पश्चिम रेल्वेवरील गर्दी होणार कमी
मुंबईच्या पश्चिम उपनगरात लोकसंख्येची घनता जास्त असल्याने लोकल गाड्यांवर प्रचंड ताण असतो. हार्बर रेल्वे बोरिवलीपर्यंत आल्यास प्रवाशांना प्रवासासाठी एक अतिरिक्त पर्याय उपलब्ध होईल. यामुळे विरार आणि बोरिवलीहून सुटणाऱ्या धीम्या गतीच्या गाड्यांवरील भार कमी होईल. हा प्रकल्प मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी गेमचेंजर ठरणार असून येणाऱ्या काळात मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायी होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world