Mumbai News : महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परस्परविरोधी वक्तव्यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी राज्यातील बेपत्ता पाकिस्तानी नागरिकांचे वृत्त फेटाळून लावले आणि सांगितले की या सर्वांचा शोध लागला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्राने जारी केलेल्या सूचनेनुसार पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं की, "जर 107 पाकिस्तानी नागरिक" बेपत्ता असतील तर पोलीस त्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे म्हटलं की, "पाकिस्तान आणि पाकिस्तानींवर दया दाखवण्याचे कारण नाही. जे पाकिस्तानींना आश्रय देत आहेत त्यांनाही सोडले जाणार नाही."
विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने स्पष्ट उत्तर देण्याची मागणी केली. सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, "संपूर्ण बहुमत असूनही सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष होणे दुर्दैवी आहे. ही अत्यंत संवेदनशील माहिती असल्याने सरकारला यावर उत्तर द्यावे लागेल. सरकारच्या उच्च स्तरावर असा गैरसमज होत आहे हे आश्चर्यकारक आहे. माझ्यासाठी ही नवीन गोष्ट आहे आणि कोणत्याही राज्यात मी पहिल्यांदाच असं पाहत आहे."
(नक्की वाचा- Pune Traffic : पुण्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवार मैदानात, अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत काय ठरलं?)
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या संपादकीयमध्ये देखील फडणवीस सरकारचं इतक्या संवेदनशील विषयावर एकमत नाही, असं म्हटलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री परस्परविरोधी विधाने करत असतील तर जनतेने कोणावर विश्वास ठेवायचा, असा सवाल उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने केला आहे.