जुई जाधव, प्रतिनिधी
mumbai kabutar khana news : सध्या मुंबईतील कबुतरखान्यांचा मुद्दा पेटला आहे. कबुतरांच्या विष्ठेमुळे अनेक आजारांना सामोर जावं लागतं. परंतु जैन समाजाचं म्हणणं आहे की, कबुतरांमुळे कुठलाही आजार होत नाही आणि कबुतरखाना बंद करण्यावर त्यांचा विरोध आहे. गेल्या 25 वर्षात कबुतरांमुळे केवळ दोन जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु ज्यांना या कबुतरांमुळे त्रास झाला आणि आजार झाला त्यांच्या काय समस्या आहेत हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. (diseases are caused by pigeon droppings)
वनिता विजय सांगडे, वय वर्ष 51. वनिता सांगडे या गेल्या 10-11 वर्षांपासून त्रस्त आहेत एका आजारामुळे. आजार कसला तर त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो. त्वचेचा रोग आहे. खोकल्याचा त्रास. मात्र हे सगळं कशामुळे तर कबुतरांमुळे.... वनिता या त्यांच्या मुलाला डिसिल्वा शाळेत सोडायला यायच्या. ही शाळा कबुतरखान्याजवळ आहे. मात्र सतत या परिसरात राहून त्यांना त्रास जाणवू लागला. सुरुवातीला त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना हा साधा त्रास असल्याचं वाटतं. औषधं घेतल्याने ठीक होईल. परंतु परिस्थिती पुढे गंभीर होत गेली आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यावर त्यांना फुप्फुसात कबुतराच एक पीस गेल्याने हा त्रास होत असल्याचं लक्षात आलं. मात्र यावर कोणतेही उपचार नाही. केवळ औषधं आणि बाहेरून लावण्यात आलेली ऑक्सिजन मशीन हाच काय तो उपचार.
नक्की वाचा - कबुतरांच्या विष्ठेमुळे होणारे 6 गंभीर आजार; कोणते उपाय करावे? तज्ज्ञांनी दिला महत्त्वपूर्ण सल्ला
वनिता या गेल्या 10 वर्ष घराबाहेर पडलेल्या नाहीत. पडल्या ते केवळ डॉक्टराकडे जाण्यासाठी ते ही क्वचित. वनिता यांच्या या आजाराला खूप खर्च लागणार असून लंग ट्रान्सप्लांटचा देखील पर्याय डॉक्टरानी त्यांना सुचवला. मात्र इतके पैसे कुठून आणायचे हा प्रश्न प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाला पडत असतो. केवळ कबुतरांमुळे त्यांना हा त्रास झाला आणि आता जे कबुतरखाने आहेत ते देखील बंद झाले पाहिजे अशी अपेक्षा त्यांच्या घरच्यांनी व्यक्त केली आहे. कबुतर आणि त्यांच्यामुळे होणारा आजार याला काही औषध नाही. मात्र काळजी तर घेतली जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी देखील सतर्क राहणं गरजेचं आहे.