छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजावा, ऐतिहासिक स्थाळांची माहिती व्हावी. गडकिल्ले पाहाता यावे. राज्याची संस्कृती समजावी यासाठी आयकॉनिक रेल्वे टूरची घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले पाहाता येणार आहेत. ही टूर जवळपास दहा दिवसांची असेल अशी माहिती फडणवीसांनी दिली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. या निमित्ताने त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रात सुरू असलेल्या रेल्वेच्या योजनांची माहिती दिली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
छत्रपती शिवाजी महाराज सर्कीट ट्रेनची ही यात घोषणा करण्यात आली आहे. या सर्किट ट्रेनच्या माध्यमातून राज्यातील ऐतिहासिक स्थळांना भेट देता येईल. सर्किट ट्रेनने 10 दिवस प्रवास करता येईल. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. दरम्यान रेल्वे मंत्र्यां बरोबर घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी या योजनेची माहिती दिली. मुंबईतील बरेच रेल्वे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत असं ही फडणवीसांनी सांगितलं. शिवाय राज्यातील 132 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येत आहे. महाराष्ट्रासाठी 1 लाख 73 हजार कोटीचे रेल्वे प्रकल्प उभारले जाणार आहेत. यावर्षी जवळपास 24 हजार कोटी राज्याच्या पदरात पडले आहेत.
या सर्वाचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन आहे. या ट्रेनची दहा दिवसाची टूर असणार आहे. या माध्यमातून ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत. सांस्कृतीक स्थळं आहेत, त्या ठिकाणी ही रेल्वे जाणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वेव्ह्स समिट 2025 ला हजेरी लावली होती. मुंबईत वेव्ह्स समिट 2025 होत आहे.
या शिवाय विदर्भावरही लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. रेल्वेच्या माध्यमातून विदर्भाचा छत्तीसगड-तेलंगणा बरोबर व्यवहार वाढणार आहे. गोंदिया बल्लारशा रेल्वे लाईनचे दुहेरीकरण होणार आहे. यासाठी 4819 कोटी रुपये केंद्र सरकारने दिले आहेत. हा मार्ग झाल्यास त्याचा फायदा थेट विदर्भाला होणार आहे. व्यापर व्यवसाय वाढण्यास याचा फायदा होईल. अतिशय विचार करून हा मार्ग पुढे नेला जात असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. शिवाय दुसऱ्या राज्याच्या सीमेपर्यंत हा मार्ग जात आहे. शिवाय दुर्गम जिल्हा त्याला जोडला गेला आहे. त्यामुळे जिल्ह्या बरोबरच इतर भागाचाही त्यातून विकास होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रातील जवळपास 132 स्थानकांचा विकास केला जाणार असल्याचे ही यावेळी फडणवीस यांनी सांगितले. ही 132 स्टेशन्स महाराष्ट्रातील केंद्र सरकारने रेल्वे मिनिस्ट्री डेव्हलपमेंट करता घेतलेली आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा देखील समावेश आहे. रेल्वे मंत्रालयाने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या पदरात दान टाकले आहे. त्यामुळे रेल्वेचे मोठे जाळे आणि सुधारणा होण्यास मदत होणार असल्याचं फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं.