Ajit Pawar News: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्र विधानसभेत त्यांच्या गौरवार्थ शोकप्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांसोबतच्या 2019 मधील त्या बहुचर्चित 'पहाटेच्या शपथविधी'वर पहिल्यांदाच इतका सविस्तर आणि भावनिक खुलासा केला आहे.
दिवंगत नेते अजित पवार यांच्या शोकप्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2019 मधील त्या ऐतिहासिक आणि वादग्रस्त 'पहाटेच्या शपथविधी'चे गुपित उलगडले. "अजितदादा शब्दाला जागणारे नेते होते आणि त्याचा अनुभव मी 2019 साली घेतला," अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीसांनी दादांच्या पारदर्शक स्वभावाचे कौतुक केले.
"वरिष्ठांनी निर्णय बदलला, पण दादांनी नाही!"
2019 च्या सत्तासंघर्षावर प्रकाश टाकताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यावेळी भाजप आणि राष्ट्रवादीचा एक गट एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याचा निर्णय झाला होता. मात्र राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनी शेवटच्या क्षणी आपला निर्णय बदलला, मात्र अजितदादा आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यांनी मला सांगितले होते की, 'मी एकदा शब्द दिलाय, आता मी शब्द मोडणार नाही'. त्याच शब्दाखातर आम्ही पहाटेचा शपथविधी घेतला. फडणवीस पुढे म्हणाले की, दादांना त्यांच्या या निर्णयाची मोठी राजकीय किंमत मोजावी लागली, त्यांच्यावर टीका झाली, पण ते डगमगले नाहीत.
नक्की वाचा- Bhandara News: घरात आईचे पार्थिव, डोळ्यांत अश्रू... पण मुलाने स्वत:ला सावरत दिला बोर्डाचा पेपर)
वर्षा बंगल्यावरील 'ती' रात्रीची चर्चा
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यानंतर सरकार टिकणे अशक्य झाले होते. वर्षा बंगल्यावर मी आणि अजितदादा दोघेच होतो. दादांनी मला विचारलं, आता काय करायचं? सरकार तर पडणार हे स्पष्ट होतं. मी त्यांना स्पष्ट सांगितलं की, दादा, तुम्ही शब्दासाठी स्वतःचा बळी द्यावा अशी आमची मुळीच इच्छा नाही. तुम्ही तुमचा निर्णय घ्या. सोबत जे लोक आले आहेत, त्यांच्या भविष्याचाही विचार त्यांना करावा लागला. त्यानंतरच माझ्याशी चर्चा करून दादांनी महाविकास आघाडीत परतण्याचा निर्णय घेतला, असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले.
(नक्की वाचा- Mumbai-Pune Expressway: 'मिसिंग लिंक'मुळे वेळ-अंतर वाचणार; टोल देखील अधिकचा द्यावा लागणार?)
"पोटात एक आणि ओठावर दुसरं असं दादांचं कधीच नव्हतं"
अजितदादांच्या स्वभावाबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, दादा अत्यंत रोखठोक होते. त्यांच्या पोटात जे होते तेच ओठावर असायचे. राजकारणात अशा पारदर्शक स्वभावाचे नेते मिळणे दुर्मिळ असल्याचे त्यांनी नमूद केले. "आम्ही एक दमदार आणि दिलदार मित्र गमावला आहे," अशा शब्दांत त्यांनी आपला शोक व्यक्त केला.