अमजद खान
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील 65 बेकायदा इमारतीमधील रहिवाशांना महापालिका प्रशासनाने घरे खाली करण्याच्या नोटीसा पुन्हा पाठवल्या आहेत. या विरोधात दाद मागण्याकरीता इमारतीमधील रहिवासी 15 जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार आहेत. त्यातून ते राज्य सरकारचे या प्रकरणी लक्ष वेधणार आहेत.या आंदोलनात डोंबिवलीकर नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन या रहीवाशांनी केले आहे. शिवाय अशा आशयाचे बॅनरही डोंबिवलीत झळकले आहेत.
महापालिकेच्या बनावट सही शिक्क्यांचा वापर करुन बिल्डरांनी 65 बेकायदा इमारती उभ्या केल्या. या इमारतीमधील घरे नागरीकांना विकली. त्याची आर्थिक फसवणूक केली. महापालिकेची बनावट बांधकाम परवानगी तयार करुन रेरा प्राधिकरणाकडून बांधकाम प्रमाणपत्र मिळाविले. या प्रकरणाचा पर्दाफाश वास्तूविशारद संदीप पाटील यांनी केला. त्यांनी या प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 19 नोव्हेंबर 2024 रोजी न्यायालयाने महापालिकेस 3 महिन्याच्या आत या इमारती पाडण्याचे आदेश दिले होते.
नक्की वाचा - Satara News: आली लहर केला कहर! नव्या गाडीचं सेलिब्रेशन, थेट महामार्गच रोखला, मग पुढे...
त्यानंतर न्यायालयाने रहिवासियांना काही अंशी दिलासा दिला. इमारती नियमितीकरणाची मुभा दिली. त्यासाठी इमारतीमधील रहिवाशींनी प्रस्ताव पाठविले. ते प्रस्ताव महापालिकेच्या नगररचना विभागाने फेटाळून लावले. हे प्रस्ताव अपूर्ण होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या इमारतीमधील नागरीकांना बेघर होऊ देणार नाही असे आश्वासन दिले. त्यानंतर याचिकाकर्ते पाटील यांनी न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली जात नसल्याने कायदेशीर नोटिस बजावली. पुन्हा महापालिकेने इमारतीमधील नागरीकांना नोटीस बजावल्या. या कारवाईच्या विरोधात रहिवासी आता 15 जुलैला आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार आहे.
या इमारतीतल्या रहिवासी अर्चना बाणकर यांनी सांगितले की, त्यांचे सासरे स्वातंत्र्य सैनिक आहेत. त्यांच्या आयुष्याची जमापुंजी घरासाठी लावली. आता तेच घर बेकायदा ठरविल्याने आम्ही जाणार कुठे ? राहणार कुठे ? आणि आम्ही करायचे काय? असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. द्रौपदी हायईटस या इमारतीत राहणारे भावेश शिंदे यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बेघर होऊ देणार नाही असे आश्वासन दिले. त्यानंतर महापालिकेने पुन्हा आम्हाला घरे खाली करण्याच्या नोटीस बजावल्या आहेत. मग मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाचे काय झाले ? असा सवाल त्यांनी केला.
शिवलिला इमारतीत राहणारे दिनेश देवाडी यांनी सांगितले की, आमच्या इमारतीला नोटीस बजावली आहे. माझी मुलगी इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकते. आम्ही बेघर झालो तर माझ्या मुलीचे शैक्षणिक भवितव्य अडचणीत येणार आहे. त्यामुळे बाधितांनी 15 जुलैच्या धरणे आंदोलनात जास्तीत जास्त संख्यने सहभागी व्हावे.नोटिस मिळालेल्या इमारतीमध्ये राहणाऱ्या संगिता नायर यांनी सांगितले की, माझे पती हयात असताना त्यांनी कर्ज काढून घर घेतले. बेकायदा इमारत असल्याचा धसका घेऊनच माझ्या पतीचे निधन झाले. आता घर जाणार आहे. तर मी बँकेचे हप्ते कुठून भरु असा माझ्या समोर प्रश्न उभा ठाकला आहे, असं त्या म्हणाल्या.