
Raj Thackeray : राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून मनसे राज ठाकरे यांची भेट घेतली. मात्र राज्य सरकारची भूमिका फेटाळून लावल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. दादा भुसे यांच्या भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हिंदी सक्तीविरोधात 6 जुलैला भव्य मोर्चा काढणार असल्याची घोषणा देखील राज ठाकरे यांनी यावेळी केली.
राज ठाकरे यांनी म्हटलं की, राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे माझ्याकडे येऊन गेले. त्यांनी त्यांची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांची भूमिका आम्ही फेटाळून लागली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणात अशी कुठलीही सक्ती नाही, असंही भुसे यांनी स्पष्ट केलं. हा निर्णय राज्यांवर अवलंबून आहे. इतर राज्य असा कोणताही प्रयत्न करत नाही. मात्र आपल्या राज्यकर्त्यांना हिंदी सक्ती का करायची आहे हे अनाकलनिय आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- Uddhav Raj: ठाकरेंच्या सेनेची मनसेला टाळी! 'या' मुद्द्यावर ठाकरे बंधूंची झाली युती)
सीबीएससी शाळा या आयएएस अधिकाऱ्यांच्या मुलांसाठी काढल्या गेलेल्या शाळा होत्या. कारण त्यांना देशभर फिरावं लागतं. त्या शाळांचं वर्चस्व राज्यातील शाळांवर करण्याच्या प्रयत्न सुरु आहे. केंद्राचा आणि आयएएस अधिकाऱ्यांचा तोच अजेंडा आहे, असं मला वाटतं. मात्र इतर राज्य असं काहीही स्वीकारत नाही. मग महाराष्ट्र सरकार असं का करत आहे. याचं उत्तर शिक्षणमंत्र्यांकडे नव्हतं, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
6 जुलैला गिरगाव चौपाटीवरून काढणार मोर्चा
हिंदी सक्तीला आमचा संपूर्ण विरोध आहे, हिंदी किंवा कोणत्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही. या गोष्टीसाठी मी सर्व पक्षांना आवाहन करतोय, येत्या 6 जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्या संपूर्ण मोर्चात कुठेही कोणताही झेंडा नसेल, तो संपूर्ण मोर्चा मराठी माणसाचा असेल. त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल, सर्वांना त्या मोर्चाला बोलावणार आहोत. सर्व विद्यार्थी आणि पालकांना आम्ही आमंत्रण देत आहोत. सरकारला एकदा कळूदे महाराष्ट्राच्या मनात काय आहे. महाराष्ट्राने संपूर्ण ताकद सरकारला दाखवावी, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- Hindi Imposition : पहिलीपासून हिंदी नकोच, सरकारच्या भूमिकेला अजित पवारांचाच विरोध! काय आहे अर्थ?)
शिवसेना ठाकरे गटासोबतही बोलणार
राज ठाकरे यांनी म्हटलं की, सर्व राजकीय पक्षांची मी चर्चा करणार आहे, बोलणार आहे. सर्वांनी या मोर्चात सामील व्हावं असं आवाहन आहे. इतर पक्षांप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबतही बोलणार आहे. कुठल्याही वाद आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, हे माझं वाक्य लक्षात ठेवा. हे तुम्हाला 6 जुलै रोजी समजेल.
जो कट आहे, मी याला कटच म्हणेन. महाराष्ट्राचं मराठीपण घालवण्याचा कट आहे तो उद्ध्वस्त करण्यासाठी सर्वांनी या मोर्चात सहभागी व्हावं, असं माझं आवाहन आहे. मला हेही बघायचं आहे कोण कोण या मोर्चात सामील होणार. कोण येणार नाहीत हेही मला बघायचं आहे. ही अत्यंत महत्त्वाची लढाई आहे, या लढाईत संपूर्ण महाराष्ट्राने उतरावं असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.
VIDEO : राज ठाकरे यांची पत्रकार परिषद
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world