
Jayant Patil : कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी संपण्याचं नाव घेत नाही. सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी कांदा चाळींमध्ये पडून आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांदा सडून शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. तर दुसरीकडे कांद्यांचे दर सतत घसरत आहेत. त्यामुळे कांद्याचे घसरते दर आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान या गोष्टींची गांभीर्याने दखल घेत इतर पिकांप्रमाणे कांद्यालाही हमीभाव ठरवून द्यायला ,हवा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी आज केली.
आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून प्रतिक्रिया देताना जयंतराव पाटील म्हणाले की, "सध्या देशभरातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे. बांगलादेशने कांद्याची आयात बंद केल्याने शेतकऱ्यांचा कांदा पडून आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील नाशिक, नगर आणि अन्य भागात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड होते. आज परिस्थिती अशी आहे की, कांद्याची साठवणूक केली तर कांदा सडतो. म्हणून शेतकऱ्यांना कमी भावात कांदा विकावा लागत आहे. दिवसेंदिवस कांद्याची किंमत घसरत चालली आहे."
(नक्की वाचा- Ujjwal Nikam EXCLUSIVE: 'तर मुंबईवर हल्ला झालाच नसता', संजय दत्त बाबत उज्वल निकम यांचा खळबळजनक खुलासा)
पुढे ते म्हणाले आहेत की, "कांद्याची लागवड करताना शेतकऱ्यांना बरीच आव्हाने पार करावी लागतात. पीक आल्यानंतरही त्याची मोठ्या प्रमाणात जपणूक करावी लागते. त्यामुळे कांदा उत्पादकांना हे नुकसान सहन करण्यापलीकडे आहे. सरकारने या गोष्टींची गांभीर्याने दखल घेत इतर पिकांप्रमाणे कांद्यालाही हमीभाव ठरवून द्यायला हवा", अशी मागणी त्यांनी केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world