Kalyan News : कल्याणमध्ये काँग्रेसच्या बैठकीत झालेल्या वादानंतर आता राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. या घटनेवर भाजपाने तीव्र प्रतिक्रिया देत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भाजपाचे शहर अध्यक्ष वरुण पाटील यांनी काँग्रेसवर टीका करत म्हटले आहे की, काँग्रेसमध्ये महिलांना आदर दिला जात नाही आणि हीच त्या पक्षाची संस्कृती आहे. बैठकीत घडलेला प्रकार अत्यंत चुकीचा असून अशा घटना कोणत्याही पक्षात घडू नयेत.
काँग्रेसवर भाजपचा हल्लाबोल...
कल्याण पूर्वेतील एका सभागृहात आयोजित काँग्रेस बैठकीदरम्यान काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी आणि जिल्हाध्यक्ष राजा भाऊ पातकर यांच्यात वाद झाला. कार्यकर्त्यांच्या नाश्त्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा वाद चिघळत गेला. या दरम्यान कांचन कुलकर्णी यांनी पातकर यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी शिवीगाळ केल्याचा दावा केला.
कांचन कुलकर्णी यांनी राजा पातकर यांना कानशिलात लावली. तर पातकर यांनी हा वाद “संघटनेतील अंतर्गत व कौटुंबिक विषय” असल्याचं सांगितले. या घटनेमुळे काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाले असून राजकीय पातळीवर आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. भाजपाने या प्रकरणावरून काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला असून पुढे काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.