Kalyan News : कल्याण-डोंबिवलीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात सुरू असलेला राजकीय संघर्ष आता अधिक तीव्र होत असल्याचं चित्र आहे. भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांना शिवसेनेत प्रवेश दिल्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख महेश गायकवाड यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली होती.
दीपेश म्हात्रे यांचा शिंदे गटाला थेट इशारा
दरम्यान, या वादावर भाजपचे पदाधिकारी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी शिवसेनेला थेट इशारा दिला आहे. शनिवारी मनसेच्या अनेक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि दीपेश म्हात्रे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. डोंबिवलीत मनसेला मोठा धक्का मानला जात आहे. यावेळी केडीएमसी भाजपचे शशिकांत कांबळे आणि ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील उपस्थित होते.
नक्की वाचा - ठाणे स्थानकातील अस्वच्छ स्टॉल सील, 15 हजार रुपयांचा दंडही
यावेळी बोलताना दीपेश म्हात्रे यांनी शिवसेना (शिंदे गट) वर जोरदार टीका करत, "ज्यांनी युतीधर्म तोडला आहे, त्यांना आम्ही धडा शिकवणारच," असा इशारा दिला. तसेच, शिवसेना शिंदे गटाचे "अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक होते. मात्र, युतीधर्म जपण्यासाठी आम्ही त्यांना थांबवत होतो. आता उद्यापासून फक्त पाहत जा, शिवसेनेचे किती लोक भाजपमध्ये प्रवेश करतात," असेही ते म्हणाले. रविवारी कल्याणमध्ये भाजपच्या कोर कमिटीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सध्या सुरू असलेले पक्षांतराचे राजकारण, शिवसेनेला भाजपकडून दिले जाणारे उत्तर आणि आगामी राजकीय रणनीती याबाबत या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता असून, या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे