Kalyan News: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (केडीएमसी) शिक्षण विभागाचा एक धक्कादायक आणि अनागोंदी कारभार समोर आला आहे. महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळेतील नववी आणि दहावीचे वर्ग अचानक बंद करण्यात आल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. यात अधिक गंभीर बाब म्हणजे, 2026 मध्ये दहावीची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालेल्या सुमारे ६० विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका (मार्कशीट) आणि शाळा सोडल्याचा दाखला (लिव्हिंग सर्टिफिकेट) देण्यात आलेला नाही. अकरावी प्रवेशाची अंतिम मुदत अगदी जवळ आली असताना कागदपत्रेच हाती नसल्याने या सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
प्रवेशाचा शेवटचा टप्पा, पण कागदपत्रे मिळेनात
नेतीवली परिसरातील प्रबोधनकार ठाकरे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून शाळेकडे सतत पाठपुरावा केला होता. मात्र, शाळा प्रशासनाकडून त्यांना कोणतीही समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. अखेर हवालदिल झालेल्या पालकांनी शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी सचिन भासरे आणि सुरेश तेलावणे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. त्यानंतर संतप्त विद्यार्थी, पालक आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने थेट केडीएमसीचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांची भेट घेऊन महापालिका प्रशासनाला धारेवर धरले.
(नक्की वाचा- Pune Crime: PSI असल्याचं भासवण्यासाठी वर्दी घातली, पण एक बारीक चूक अन् अधिकाऱ्याच्या हुशारीने महिलेचा पर्दाफाश)
"मी हिंदी भाषिक असून मुलांना मराठीत शिकवते"
या बैठकीदरम्यान पालक आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. शिक्षक आणि प्रशासनातील अंतर्गत वाद किंवा राजकारणाचा फटका निष्पाप विद्यार्थ्यांना का बसत आहे, असा थेट सवाल पालकांनी विचारला. यावेळी एका उत्तर भारतीय महिला पालकाने उपस्थित केलेल्या प्रश्नाने केडीएमसी अधिकाऱ्यांची बोलतीच बंद झाली. ती महिला अत्यंत भावनिक होऊन म्हणाली, "मी मूळची उत्तर प्रदेशची आहे. पण तरीही मी माझ्या मुलांना मुद्दाम मराठी शाळेत शिकवते. एकीकडे तुम्ही सर्वजण मराठी भाषा जपण्याच्या मोठ्या गप्पा मारता आणि दुसरीकडे सरकारी मराठी शाळांचे वर्गच बंद करता? आमच्या मुलांचे भविष्य खराब करू नका, कृपया शाळा बंद करू नका!
(नक्की वाचा- Iran-Israel War: जगाची चिंता वाढली, युद्ध पुन्हा भडकणार? इराणचा इस्रायलवर शक्तीशाली हल्ला)
दोषींवर कारवाईचे उपायुक्तांचे आश्वासन
या बैठकीची माहिती मिळताच माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनीही उपायुक्तांची भेट घेऊन पालकांच्या मागणीला पाठिंबा दिला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत केडीएमसी उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी शिक्षण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ दालनात बोलावून घेतले. "विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान खपवून घेतले जाणार नाही," असे सांगत त्यांनी तात्काळ सर्व 60 विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका आणि लिव्हिंग सर्टिफिकेट (LC) उपलब्ध करून देण्याचे कडक आदेश दिले.
उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी सांगितले की, "विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे देण्याची प्रक्रिया आता युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. तसेच, मराठी माध्यमाचे हे वर्ग नेमके कोणत्या कारणामुळे आणि कोणाच्या परवानगीने बंद करण्यात आले, याची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल."