- कल्याण रेल्वे स्थानकासमोर रिक्षाचालक आणि प्रवाशांमध्ये भाडेवाढीवरुन राडा झाला
- सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या घटनेत प्रवाशांच्या गटाने रिक्षाचालकाला मारहाण केली
- महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी तातडीने धाव घेतली
अमजद खान
रिक्षा चालक आणि प्रवाशी यांच्यात नेहमीच वाद होत असतात. कल्याण डोंबिवलीत हे वाद काही नवीन नाहीत. कुठे ने कुठे कोणत्या ना कोणत्या कारणावरून हे वाद होत असल्याचं समोर येत आहे. असाच एक वाद टोकाला गेला. तो इतका टोकाला गेला की रिक्षा चालकाला प्रवाशांनीच बदड-बदड बदडले. त्यांचा हा संपूर्ण राडा कल्याण रेल्वे स्टेशन बाहेर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या राड्यामुळे तिथे बघ्यांची ही गर्दी जमली होती.
कल्याणमध्ये भाड्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झाली. ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. कल्याण रेल्वे स्थानकासमोरील परिसरात एका रिक्षाचालकाला प्रवाशांच्या गटाने मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर रिक्षा चालक संतप्त झाले आहेत. रिक्षा भाड्याच्या मुद्द्यावरून रिक्षाचालक आणि प्रवाशांमध्ये वाद झाला. हा वाद वाढत जाऊन प्रवाशांच्या गटाने रिक्षाचालकाला भर रस्त्यात मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. तसे सीसीटीव्हीत ही दिसत आहे.
घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाची माहिती मिळताच महात्मा फुले पोलीस ठाणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधितांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.दरम्यान, कल्याण स्टेशन परिसरात चोरी, लूटमार आणि मारामारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. भरदिवसा घडणाऱ्या अशा घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
या परिसरात पोलीस गस्त आणि सुरक्षा व्यवस्था वाढविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या ठिकाणी अनेक गैर प्रकार ही होत आहेत. अशात आता ही मारहाणीची घटना ही समोर आली आहे. स्टेशन परिसरात होणाऱ्या अशा घटनांना आळा घालावा अशी मागणी होत आहे. स्टेशन परिसरात मोठी गर्दी असते. अशा स्थितीत पोलीसांनी ही तिथे गस्त वाढवणे गरजेचे आहे. अनेक वेळा असे प्रसंग स्टेशन परिसरात पाहायला मिळत आहेत. यावादा नंतर नागरीक ही भडकले आहेत.