- बकरी ईदच्या दिवशी कल्याणमधील दुर्गाडी किल्ला परिसरात मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले
- शिवसेनेने मागील चाळीस वर्षांपासून ईदच्या दिवशी मंदिरात प्रवेशासाठी घंटा नाद आंदोलन करत आहे
- ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ला परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आणि अनेक रस्ते बंद करण्यात आले होते
अमजद खान
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये तणाव पाहायला मिळत आहे. ईद निमित्ताने ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या परिसरात असलेल्या ईदगावर मुस्लिम बांधव नमाज पठण करतात. याचवेळी या परिसरातील दुर्गादेवीच्या मंदिरात हिंदू भाविकांना प्रवेश बंदी असते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं दुर्गाडी किल्ल्यावर धडक देण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलीसांनी किल्ल्या खालीच अडवले. शिवसेनेकडून गेल्या 40 वर्षापासून हे आंदोलन केले जाते. आज बकरी ईदच्या दिवशी ही शिवसैनिकांनी इथं घंटा नाद आंदोलन केले. त्याच वेळी बाजूलाच ईदची नमाज पठण होणार होते. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मंदीर प्रवेश बंदी का? हिंदूंवर अन्याय का? असा सवाल करत गेल्या 40 वर्षापासून शिवसेना बकरी ईदच्या दिवशी मंदिरात प्रवेशासाठी घंटा नाद आंदोलन करते. यंदा भाजप देखील आक्रमक झाली होती. आम्हाला मंदिरात प्रवेश दिला नाही तर आम्ही हनुमान चालीसा पठण करू असा इशारा दिला होता. त्यामुळे कल्याणमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. आज बकरी ईद निमित्ताने पहाटे पाच वाजल्यापासून दुर्गाडी किल्ला परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, डीसीपी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आली होती. दोन ते तीन रस्ते बंद करण्यात आले होते. तिकडे नमाज पठण होत असताना दुसरीकडे लालचौकी परिसरात शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट, हिंदूवादी संघटनाच्या पदाधिकाऱ्याने आंदोलन केलं. पदाधिकारी कार्यकर्ते यांनी दुर्गाडी किल्ला मंदिरात जायचे प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी यांना लालचौकी परिसरात थांबवले होते. कोणत्याही अनुचित प्रकार होऊ नये याची काळजी पोलिसांनी घेतली होती.
एकीकडे हिंदूत्ववाद्यांचे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे दुर्गाडी किल्ला परिसरात मुस्लिम बांधवाकडून नमाज पठण झाले. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव हजर होते. त्याच वेळी दुसरीकडे लालचौकी परिसरात शिवसेना शिंदे गट आणि हिंदूवादी संघटना कडून आंदोलन सुरू होतं. दोन्ही ठिकाणी पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त होता. टिळक चौकात नाकेबंदी करण्यात आली होती. पण काहींनी बॅरीकेट्स तोडून किल्ल्याकडे जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलीसांनी या आंदोलनकर्त्यांना वेळीच रोखले आणि पुढील अनर्थ टळला.