Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींची निराशा! सरकारने 3000 रुपये दिले, हातात 500-1000 रुपये आले

मोठ्या अपेक्षेने लाडक्या बहिणी जमा झालेले पैसे काढण्यासाठी बँकेत आल्या. मात्र त्यांना तिथे मोठा धक्का बसला. कारण खात्यात जमा झालेल्या 3 हजारांपैकी फक्त 500 ते 1000 रुपयेच त्यांच्या हातात आले.

Advertisement
Read Time: 2 mins

सुजीत आंबेकर, सातारा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. रक्षाबंधणाच्या आधीच अनेक महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये जमा झाले. मात्र अनेक लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा पडली आहे. कारण खात्यात पैसै जमा झाले, मात्र बँकांनी दंडाच्या नावाखाली अनेक महिलांचे पैसे कापले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे अनेक महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. मात्र मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली बँकांनी दंड वसूल केल्याने महिलांच्या हाती अवघे 500 ते 1000 रुपये आले आहेत. त्यामुळे महिला आणि बँक कर्मचारी यांच्यात वाद-विवाद झाल्याचं पाहायला मिळालं.

लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्यानंतर महिलांची पैसे काढण्यासाठी बँकेत गर्दी पाहायला मिळाली. शुक्रवारचा दिवस बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रचंड तणावात गेला. कारण बँक खाते आधार लिंक करण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. प्रत्येक बँकेच्या शाखेसमोर सकाळपासूनच 100 ते 500 महिला रांगेत उभ्या होत्या. 

(नक्की वाचा-  'अजितदादा म्हणाले, तुमच्यासाठी काय घर विकू", आशा वर्करने पगारवाढीबाबत सुप्रिया सुळेंसमोर मांडली व्यथा)

मोठ्या अपेक्षेने लाडक्या बहिणी जमा झालेले पैसे काढण्यासाठी बँकेत आल्या. मात्र त्यांना तिथे मोठा धक्का बसला. कारण खात्यात जमा झालेल्या 3 हजारांपैकी फक्त 500 ते 1000 रुपयेच त्यांच्या हातात आले. आपले पैसे कसे कमी झाले हे अनेक महिलांना कळालच नाही. बाकीची रक्कम कुठे गायब झाली? असा सवाल त्यांनी बँक कर्मचाऱ्यांना केला. बँकवाल्यांनी आमचे पैसे खाल्ले, असा आरोप त्या करत होत्या. त्यावर खात्यात कमीत कमी जेवढी रक्कम पाहिजे, तेवढी रक्कम नसल्याने तुम्हाला दंड लागला व ती रक्कम सिस्टिमने कापली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Advertisement

(नक्की वाचा- Ladki Bahin Yojna : 'लाडकी बहीण' योजनेचे पैसे अजून खात्यात जमा झाले नाहीत? ही कारणे समजून घ्या)

मिनिमम बॅलेन्सचा नियम काय आहे?

बँक अकाऊंटमध्ये नियमानुसार किमान रक्कम न ठेवल्यास ग्राहकांना नॉन मेंटेनन्स दंड लावतात. त्यामुळे बँक अकाऊंटमध्ये मिनिमम बॅलेन्स ठेवणे गरजेचं असते. मात्र अनेकांना हे माहीत नसते. त्यामुळे बँक अकाऊंटमधील रक्कम मिनिमम बॅलेन्सपेक्षा कमी झाल्यास बँक दंड आकारण्यास सुरुवात करतात. बँकांनुसार मिनिमम बॅलेन्सची रक्कम शहरी आणि ग्रामीण भागात वेगवेगळी असते. प्रत्येक बँकेच्या दंडाच्या रक्कमेत देखील फरक आहे.