- यंदा महाराष्ट्रात बारावीच्या परीक्षेत एकूण १,४६,२१५ विद्यार्थी नापास झाले आहेत
- राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के असून मुंबई विभागातून ३२,०८६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत
- मुलांच्या तुलनेत मुलींची कामगिरी चांगली असून मुलांचे नापास होण्याचे प्रमाण मुलींपेक्षा दुप्पट आहे
बारावी परिक्षेचा निकाल लागला आहे. या निकालानंतर पास झालेल्या विद्यार्थ्यांची सगळीकडे चर्चा आहे. पण नापास झालेल्या विद्यार्थ्यांबाबत कुणालाच काही माहिती नसते. बारावीच्या निकालाचा उत्साह सर्वत्र असला, तरी राज्याच्या शैक्षणिक चिंतेत भर घालणारी आकडेवारी समोर आली आहे. यंदा राज्यभरातून एकूण 1,46,215 विद्यार्थी अनुत्तीर्ण म्हणजेच नापास झाले आहेत. त्यात मुंबई विभागातील विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचं समोर आले आहे. राज्याचा एकूण निकाल 89.79% लागला असला, तरी नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येने प्रशासनासमोर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
मुंबई आणि पुणे विभागातील स्थिती
राज्यात यंदा 14,33,058 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. ज्यापैकी 12,86,843 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विभागनिहाय पाहिल्यास मुंबई विभागातून सर्वाधिक 32,086 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यापाठोपाठ पुणे विभागात 21,146 आणि नाशिक विभागात 15,013 विद्यार्थी नापास झाले आहेत. लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 84.14% लागला आहे. तेथे 14,250 विद्यार्थी अपयशी ठरले आहेत. ही आकडेवारी पाहीले असता मुंबई विभागात सर्वात जास्त विद्यार्थी नापास झाले आहेत. तर सर्वात कमी विद्यार्थी हे लातूर विभागात नापास झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.
मुलांच्या तुलनेत मुलींची कामगिरी सरस
निकालाच्या टक्केवारीप्रमाणेच नापास होण्याच्या प्रमाणातही मुलांची संख्या मोठी आहे. यंदा 1,00,040 मुले अनुत्तीर्ण झाली आहेत. तर मुलींच्या नापास होण्याचे प्रमाण त्यामानाने कमी असून 46,175 मुली अनुत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींचा एकूण निकाल 93.15% आहे. तर मुलांच्या निकालाची टक्केवारी 86.80% इतकी नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे पास होणाऱ्या विद्यार्थ्यांत विद्यार्थिनींनी बाजी मारली आहे. पण नापास होण्यामध्ये मुलांची संख्या जास्त आहे. म्हणजेच मुलांच्या तुलनेत मुलींची कामगिरी ही सरस असल्याचं दिसून येत आहे.
बारावीच्या निकालाने राज्याच्या गुणवत्तेचा आलेख उंचावलेला दिसत असला, तरी 1 लाख 46 हजार 215 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याने शैक्षणिक गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मुंबई विभागात सर्वाधिक 32 हजार 086 विद्यार्थी नापास झाले असून, महानगरातील शिक्षणाच्या दर्जाबाबत चिंतेचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलांची संख्या एक लाखाच्या पार गेली असून, हे प्रमाण मुलींच्या तुलनेत दुप्पट आहे. लातूर विभागाची घसरणही या निमित्ताने ठळकपणे समोर आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world