यशपाल सोनकांबळे, पुणे
महाराष्ट्रात सध्या हवामानाचे विचित्र रूप पाहायला मिळत आहे. विदर्भात सूर्य आग ओकत असतानाच, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाची चिन्हे दिसू लागली आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुणे, नाशिक आणि साताऱ्यासह अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांचा 'यलो अलर्ट' जारी केला आहे.
हवामानात बदल होण्याची शक्यता
हवामान विभागाच्या माहितीनुसार मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव दक्षिण मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात नाशिक, रायगड, लातूर, पालघर, रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींसह वादळी वाऱ्यांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाटही पाऊस होऊ शकतो.
(नक्की वाचा- Pandharpur News: रिलस्टार महिलेला वाढदिवसाचं भयंकर 'गिफ्ट'; अख्ख गाव हादरलं! प्रियकराला अटक)
पुढील काही तास हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात सध्या उष्णतेचे तीन वेगवेगळे पॅटर्न पाहायला मिळत आहेत. विदर्भात कोरडी आणि अत्यंत तीव्र उष्णता असून तापमान 44 अंशांच्या पुढे गेले आहे. अकोला, अमरावती, वर्धा या भागांत उष्णतेची तीव्रता सर्वाधिक आहे.
उष्णतेचा तडाखा
मराठवाड्यातही उष्णतेचा तडाखा कायम असला तरी तो विदर्भाच्या तुलनेत किंचित कमी आहे. परभणी, छत्रपती संभाजीनगर आणि उदगीर येथे तापमान 40 ते 42 अंशांच्या दरम्यान नोंदवले गेले आहे. तर मुंबई, कोकण आणि पुणे विभागात तापमान तुलनेने कमी असले तरी आर्द्रतेमुळे उकाडा अधिक जाणवत आहे.
(नक्की वाचा- Dharashiv News: तहसीलदारांना मुलीसमोरच गाडी अडवून जीवे मारण्याची धमकी; परंडा तहसील कार्यालयातील प्रकार)
मुंबई आणि किनारपट्टी भागात तापमान 31 ते 33 अंशांच्या दरम्यान असून आर्द्रता 65 ते 80 टक्क्यांपर्यंत आहे. पुण्यात तापमान सुमारे 39.7 अंशांवर पोहोचले आहे. समुद्र किनारपट्टीवर उष्ण व दमट हवामान राहणार आहे.
शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा
गेल्या काही आठवड्यांपासून राज्यभर उष्णतेची लाट कायम असताना, येत्या काही दिवसांत होणाऱ्या पावसामुळे तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्यम ते हलक्या सरींसह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. त्यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सतर्क राहावं लागणार आहे. या पावसामुळे काढलेलं पिके, फळभाज्या आणि पालेभाज्या यांचं नुकसान होऊ शकतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world