...तर 288 उमेदवारांना पाडू; मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा

Manoj Jarange : कुणीही विरोध केला तरी सगेसोयरे अंमलबजावणी होणार आहे. आमचे आणि कुणबी समाजाचे निकष सारखेच आहेत. मराठा पोट जात म्हणून ओबीसीमध्ये घ्या, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.

Advertisement
Read Time: 2 mins

लक्ष्मण सोळुंके, जालना

मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा आज छत्रपती संभाजीनगर येथे समारोप होत आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेला अल्टिमेटम देखील आज संपत आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर निशाणा साधला आहे. मराठा समाजाला न्याय द्या, आमची खदखद तुम्हाला परवडणारी नाही. सरकारला सावध करतो की आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्यास तुमचे 288 उमेदवार पाडू, असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं की, सरकारला सत्तेवर मराठ्यांनीच बसवलं आहे.आता विधानपरिषदेत जे निवडून आलेत त्यांना मराठ्यांच्या आमदारांनीच मतदान केलं आहे आमच्यावर अन्याय झाला तर या आमदारांना पुन्हा लोक निवडून देणार नाहीत. मराठ्यांच्या जीवावर काल आमदार झाले.  ज्यांनी या आमदारांना मतदान केलं त्यांची जबाबदारी आहे आता जातीयवाद होऊ नये. 

(नक्की वाचा- मनोज जरांगे आज काय भूमिका घेणार?, सरकारला दिलेला अल्टिमेटमही आज संपणार)

तर 288 उमेदवार पाडू

विरोधकांनी आरक्षणासंबंधी बैठकीला जायला हवं होतं . विरोधक बैठकीला आले नाहीत म्हणून चालढकल करणे योग्य नाही. तुम्ही सरकार आहात, तुम्ही आरक्षण द्यायला हवं. तुम्ही आमच्या पोरांचे बळी घेणार का? लोक रस्त्यावर उतरत आहेत, हे तुम्हाला दिसत नाही का? सगळ्या जनतेला समान न्याय द्या. सरकारला मराठ्यांचा रोष परवडणारा नाही. आरक्षण ही आमची खदखद आहे. मी सरकारला सावध करतोय की आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्यास 100 टक्के तुमचे 288 उमेदवार पाडू, असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला. 

( नक्की वाचा : Pankaja Munde : पंकजा मुंडेंचं पावणेपाच वर्षांनी कमबॅक, विधानपरिषद निवडणुकीत दणदणीत विजय )

कुणीही विरोध केला तरी सगेसोयरे अंमलबजावणी होणार आहे. आमचे आणि कुणबी समाजाचे निकष सारखेच आहेत. मराठा पोट जात म्हणून ओबीसीमध्ये घ्या. आमच्या व्हॅलिडिटी करून घ्या. मात्र मुद्दाम हे टाळलं जातंय. काही अधिकारी जाणूनबुजून हे देणं टाळत आहेत. मुख्यमंत्र्यांना यात लक्ष घालावे, असं आवाहन देखील मनोज जरांगे यांनी केलं आहे. 

Advertisement

आजचा दिवस वाट बघू

सरकारशी आमचं काहीही बोलणं झालेला नाही. आज पूर्ण दिवस त्यांच्याकडे आहे. आजचा दिवस वाट बघू. सरकार मराठ्यांची फसवणूक करतंय का ते बघू. आमचे अजूनही काही टप्पे बाकी आहेत. आता पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहोत. लवकरच तो देखील जाहीर करू, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.