जरांगे निवडणूक लढवण्याच्या तयारीत, आतापर्यंत 150 अर्ज; माजी आमदार-आमदारपुत्राचाही समावेश 

पुणे, नाशिक, बीड, धाराशिव, नांदेड, लातूर, जळगाव या जिल्ह्यातील उमेदवारांबद्दलचा निर्णय प्राथमिक पातळीवर घेतला जाऊ शकतो.

Advertisement
Read Time: 2 mins
छत्रपती संभाजीनगर:

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी विधानसभेच्या निवडणुकीत (Vidhan Sabha Election) उमेदवार उतरवण्याची घोषणा केली आहे. 7 ते 17 ऑगस्टदरम्यान जरांगेंकडे 150 इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. यातील 12 जणं हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहेत. वैजापूर, गंगापूर, फुलंब्री, कन्नड, सिल्लोड मतदारसंघात सर्वाधिक इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 29 ऑगस्टला आंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन निवडणुकीबाबत निर्णय घेणार असल्याचेही जरांगे यांनी जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी इच्छुकांकडून अर्ज व परिचय पत्र मागवले होते. 

आंतरवालीत 29 ऑगस्टच्या बैठकीत पुणे, नाशिक, बीड, धाराशिव, नांदेड, लातूर, जळगाव या जिल्ह्यातील उमेदवारांबद्दलचा निर्णय प्राथमिक पातळीवर घेतला जाऊ शकतो. विशेष म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यातून एक माजी आमदार, आमदारपुत्रानेही अर्ज केल्याची माहिती आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 9 विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातून आतापर्यंत 12 इच्छुकांनी परिचय पत्रे दिली आहेत. यात एका माजी आमदाराचा आणि एका माजी आमदाराच्या पुत्राचादेखील समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

नक्की वाचा - न्यायालयातच वकील कोसळला, न्यायाधीशही धावले; नागपुरात वकिलाचा धक्कादायक शेवट!

अजून तीन दिवस स्वीकारणार अर्ज
20 ऑगस्टपर्यंत सर्व इच्छुक उमेदवारांचे परिचय पत्र स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर 29 ऑगस्टला आंतरवालीत सकल मराठा समाजाची बैठक बोलावण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील समन्वयकांना बोलावून जरांगे यांनी सूचना केल्या आहेत. हे समन्वयक आता मराठा समाजाला बैठकीसाठी आमंत्रित करणार आहेत. या बैठकीत विधानसभा निवडणूक लढवायची की नाही ? याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.