बेस्ट बसच्या तिकीट दरात महिनाभरापूर्वी वाढ करण्यात आली होती. महसूल वाढविण्याच्यादृष्टीने ही वाढ झाल्याचं सांगितलं जात होतं. दरम्यान महिनाभरातच बेस्टच्या प्रवासी संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
९ मेपासून बेस्ट बसचे तिकीट दर दुप्पट करण्यात आले होते. परिणामी प्रवाशांनी याला नापसंती दिली आहे. तिकीट दर थेट दुप्पट केल्यामुळे प्रवासी पर्यायी रिक्षेचा वापर करीत असल्याचं समोर आलं आहे. उदाहरण द्यायचं झाल्यास कुर्ला ते बीकेसी या मार्गावरील बेस्ट बसचं तिकीट आधी पाच रुपये तर एसी बसचा तिकीट सहा रुपये होतं. मात्र दरवाढीनंतर हा तिकीट दर अनुक्रमे दहा ते बारापर्यंत पोहोचला. दर दुसरीकडे येथून जाणाऱ्या रिक्षा २० ते ३० रुपये आकारतात. अशावेळी प्रवासी बसचे वाढीव दर आणि त्यातही होणाऱ्या धक्काबुक्कीपेक्षा शेअर रिक्षाने जाणं पसंत करतात.
नक्की वाचा - IMD Rain Forecast : मान्सून पुन्हा सक्रिय होणार; 12 जूननंतर या भागात मूसळधार पावसाचा अंदाज
बेस्टचा तोटा दूर करण्यासाठी ही भाडेवाढ करण्यात आली आहे. यापूर्वी २०१९ जुलैमध्ये भाडे कमी करून प्रवासी वाढविण्याचा बेस्टकडून प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे प्रवासी संख्या १६ लाखांवरुन ३१ लाखांपर्यंत पोहोचले होते. दरम्यान आता केलेल्या भाडेवाढीमुळे बेस्टला सरासरी ७४ कोटी वाढल्याची नोंद आहे. भाडेवाढीच्या पहिल्या दिवशी २३ लाख १७ हजार प्रवाशांनी जास्त दराचे तिकीट काढून प्रवास केला. त्यातून दोन कोटी ९३ लाख ४१ हजार महसूल जमा झाला होता. प्रवाशांच्या संख्येत घट झाल्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवर धावणाऱ्या बसेसची संख्याही कमी झाली आहे.