मुंबईतील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी आणि प्रवासाचा दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. सिंगापूर आणि हाँगकाँगच्या धर्तीवर होणाऱ्या धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मुंबईत 'हवाई टॅक्सी' (Air Taxi) सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या भविष्यातील हवाई वाहतुकीसाठी धारावीत विशेष 'व्हर्टीपोर्ट' विकसित केला जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत या जागतिक दर्जाच्या वाहतूक व्यवस्थेला गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
देशातील पहिला 'मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट हब'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, धारावीचा कायापालट करताना तिथे देशातील पहिला अत्याधुनिक 'मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट हब' उभारला जाईल. या केंद्रामध्ये रेल्वे, मेट्रो आणि रस्ते वाहतुकीसोबतच अत्याधुनिक हवाई आणि जलवाहतुकीचा मेळ घातला जाणार आहे. भविष्यातील 'हवाई टॅक्सी' सेवांचा विचार करून येथे विशेष व्हर्टीपोर्ट बनवले जाईल.
(नक्की वाचा- Beed Crime : फोन करून सांगितलं'कार्यक्रम ओके'! प्रियकराच्या मदतीने नवऱ्याला संपवलं)
विमान प्रवाशांसाठी 'सिटी चेक-इन' आणि फास्ट जेट्टी
या ट्रान्सपोर्ट हबमध्ये केवळ हवाई टॅक्सीच नाही, तर विमान प्रवाशांसाठी अत्यंत विशेष सुविधा असणार आहेत. विमान प्रवाशांना विमानतळावर जाण्यापूर्वी धारावीतच त्यांच्या सामानाची अधिकृत नोंदणी करता येईल. त्यानंतर ते थेट 'एअरपोर्ट एक्सप्रेस'ने विमानतळावर जाऊ शकतील. विमानतळापर्यंत थेट जलमार्गाने जलद पोहोचण्यासाठी धारावीत एक विशेष 'फास्ट जेट्टी' उभारण्यात येणार आहे. यामुळे रस्ते वाहतुकीवरील ताण पूर्णपणे कमी होईल. भविष्यातील मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची जोडणी देखील थेट धारावीपर्यंत आणण्याबाबत विचार सुरू आहे.
(नक्की वाचा- मित्राचा जेवणाचा डब्बा पाहून विद्यार्थ्यांची शिक्षकांकडे धाव, पालकांच्या तक्रारीनंतर विद्यार्थ्याच्या आईला अटक)
या प्रकल्पांतर्गत वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) ते धारावी या संपूर्ण परिसराचे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुशोभीकरण केले जाणार असून, मध्यभागी हरित पट्टा आणि पादचाऱ्यांसाठी आधुनिक पदपथ विकसित केले जातील. हवाई टॅक्सी, मेट्रो, रेल्वे आणि जलवाहतूक एकाच छताखाली आल्यामुळे मुंबईला जगाच्या नकाशावर एक नवी आधुनिक ओळख मिळणार आहे.