Mumbai News : मुंबईतील हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना सध्या भीषण इंधन टंचाईचा सामना करावा लागत आहे. 'असोसिएशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्स' (AHAR) या संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, इंधनाअभावी मुंबईतील 20% हॉटेल्स आधीच बंद झाली आहेत. जर हीच परिस्थिती कायम राहिली, तर पुढील दोन दिवसांत आणखी 60% हॉटेल्सना टाळे लागण्याची शक्यता आहे.
इराणमधील युद्धाचा फटका आणि काळाबाजार
इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. याचा थेट परिणाम मुंबईतील व्यावसायिक एलपीजी पुरवठ्यावर झाला आहे. 'आहार'चे अध्यक्ष विजय शेट्टी यांनी सांगितले की, बाजारात सिलिंडरचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू आहे. जो व्यावसायिक सिलिंडर 1600 रुपयांना मिळायचा, तो आता 3000 रुपयांना विकला जात आहे.
PNG पुरवठ्यावर बंदी
महाराष्ट्र राज्य सरकारचे मंत्री योगेश कदम यांनी व्यावसायिक वापरासाठीचा पाईप्ड नॅचरल गॅस (PNG) पुरवठा तूर्तास स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे हॉटेल व्यावसायिकांच्या अडचणीत भर पडली आहे.
(नक्की वाचा- Ajit Pawar Plane Case: अजितदादांच्या अपघात प्रकरणी सर्वात मोठी अपडेट; व्ही के सिंगचा CID समोर खळबळजनक दावा)
'आहार'चे सरकारला साकडे
विजय शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेणार आहे. हॉटेल उद्योगाने स्पष्ट केले आहे की, ते 25% पर्यंत इंधन कपात सहन करू शकतात. मात्र त्यापेक्षा जास्त कपात झाल्यास व्यवसाय सुरू ठेवणे 'अशक्य' होईल. या उद्योगावर अवलंबून असलेल्या लाखो कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून, केंद्र सरकारने पेट्रोलियम मंत्रालयामार्फत तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. फ्री प्रेस जर्नलने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
राज्याचे मंत्री योगेश कदम यांनी सांगितले की, सध्या परिस्थिती जमिनीवर तितकी गंभीर दिसत नसली तरी अनेक हॉटेल्सवर परिणाम झाला आहे. परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.