
मुंबईतील कोणत्याही भागात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर आहे. या कुत्र्यांमुळे त्या परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण असतं. विशेषत: रात्री उशीरा जाणाऱ्या मुंबईकरांना त्यांचा मोठा त्रास सहन करावा लागतो. याच त्रासातून अनेकदा या प्राण्यांना अन्न देणाऱ्या व्यक्तींना त्रास दिला जातो. हा त्रास देणे दंडनीय गुन्हा असल्याचं मुंबई महापालिकेनं स्पष्ट केलं आहे.
भटके श्वान आणि मांजरी या समुदाय प्राण्यांना (Community Animal) अन्न देणाऱ्या नागरिकांना त्रास देणे हा दंडनीय गुन्हा आहे. तसेच, पाळीव श्वानासंदर्भात निश्चित करण्यात आलेले कर महानगरपालिकेकडे भरणे आणि पाळीव प्राण्यांच्या परवानासंदर्भातील नियम व अटींचे पालन करणे बंधनकारक असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात येत आहे.
( नक्की वाचा : Mumbai Water Supply : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, 'या' भागातील पाणीपुरवठा 11 तास बंद ! )
सर्वोच्च न्यायालय तसेच भारतीय प्राणी कल्याण मंडळांच्या निर्देशांनुसार, मालक, अन्न देणारे नागरिक, विविध संस्था आदींसाठी पाळीव व भटक्या प्राण्यांसंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पशूवैद्यकीय आरोग्य विभागाच्या https://vhd.mcgm.gov.in/ संकेतस्थळावर सविस्तर स्वरुपात उपलब्ध आहेत. पाळीव प्राण्यांचे मालक, प्राण्यांना अन्न देणारे नागरिक, विविध संस्था आदींनी या मार्गदर्शक तत्त्वांचे काटकोरपणे पालन करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
सध्या अनेक नागरिक पाळीव श्वानांना सहचर म्हणून ठेवतात. तसेच, प्राणिमित्र/कार्यकर्ते भटक्या श्वानांची देखभाल, उपचार आणि अन्न पुरवठा करून संवेदना व्यक्त करतात. मात्र, अनेकवेळा पाळीव प्राणी मालक, भटक्या प्राण्यांचे काळजीवाहक, निवासी कल्याण संस्था व गृहनिर्माण संस्था यांच्यात मतभेद आणि संघर्ष निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर, ही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.