मुंब्रा रेल्वे दुर्घटनेत चार प्रवाशांचा हकनाक बळी गेला. यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने पत्रकार परिषद घेत येत्या काळात नव्या लोकलचे दरवाजे स्वयंचलित दरवाजे लावण्यात येतील, अशी घोषणा करण्यात आली. यानंतर प्रवासी संघटनांसह नागरिकांकडूनही विरोध व्यक्त करण्यात आला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यावर मत मांडलं. जर लोकलचे स्वयंचलित दरवाजे केले तर आतील लोक गुदमरून मरतील अशी भीती व्यक्त केली होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबईत वर्षाचे दहा महिने उकाडा असतो. अशा परिस्थितीत मुंबईतील लोकलचे दरवाजे बंद केले तर प्रवाशांना गुदमरायला होईल, अशी भावना रेल्वे प्रवासी संघटनेकडून व्यक्त करण्यात आली होती. यानंतर रेल्वे मंत्री आणि रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी आयसीएफ टीमसोबत याबाबत सविस्तर बैठक घेतली. मुंबईतील लोकल नॉन एसी गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बंद करण्याच्या समस्येवर व्यावहारिक उपाय शोधणे हा यामागील उद्देश होता.
नॉन एसी गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बंद होण्याची प्रमुख समस्या म्हणजे कमी व्हेंटिलेशनमुळे श्वास गुदमरणे. या बैठकीनंतर असं ठरविण्यात आलं की, नव्या नॉन एसी गाड्या अशा ठिकाणी डिझाइन आणि उत्पादित केल्या जातील जिथे तीन डिझाइन बदलांचा वापर करून व्हेंटिलेशनची प्रमुख समस्या सोडवली जाईल.
नक्की वाचा - 7 वर्षापूर्वी लोकलमधून पडली, 42 लाखांचा खर्च, रेल्वेने मात्र वाऱ्यावर सोडलं, वैद्य कुटुंबीयांची आपबिती
पहिले, दरवाज्यांमध्ये लूव्हर्स असतील. (हवा खेळती राहण्यासाठी दारावर पट्ट्या)
दुसरे, कोचमध्ये ताजी हवा पंप करण्यासाठी छतावरील वेंटिलेशन युनिट असतील
तिसरे, कोचमध्ये वेस्टिब्यूल असतील जेणेकरून प्रवासी एका कोचमधून दुसऱ्या कोचमध्ये जाऊ शकतील आणि नैसर्गिक पद्धतीने गर्दी संतुलित करू शकतील
या नवीन डिझाइनची पहिली ट्रेन नोव्हेंबर २०२५ पर्यंत तयार होणार असल्याचं सांगितलं जात आहे. आवश्यक चाचण्या आणि प्रमाणपत्रांनंतर ही नव्या धाटणीची लोकल जानेवारी २०२६ पर्यंत सेवेत दाखल केली जाईल. मुंबई उपनगरीय सेवांसाठी तयार केल्या जाणाऱ्या २३८ एसी गाड्यांव्यतिरिक्त अशा स्वरुपाची लोकल तयार करण्यात येणार आहे.